Sunday, December 21, 2014

हिरण्यदुर्ग : एक अत्यंत थरारक व रोमांचकारी संघर्षाचा प्रवास



अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात या कादंबरी प्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. मुळात कथानक गुंफण्याचं विलक्षण कसब असणारा लेखकच या अद्भुताच्या विश्वात प्रवेश करायला धजावतो. अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार मराठीत सुरु कसा झाला हा एक खरोखर उत्सुकतेचा विषय आहे. गो.ना. दातार यांनी रेनॉल्ड्स या पाश्चात्य लेखकाच्या कादंबर्‍यांची भारतीय रुपांतरे मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे व त्या कादंबर्‍या लोकप्रिय झाल्यावर अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक मराठी लेखक लिहू लागले. पण त्या सर्व कादंबर्‍यांचे सांगाडे विदेशी लेखकांचे असत. अगदी अलिकडे काही दशकांपूर्वी 'मर्मभेद'कार म्हणून गौरविले गेलेल्या शशी भागवतांच्या या कादंबरीतले अद्भुत ऐयार त्याच्याही आधी दोन दशकांपूर्वीच देवकीनंदन खत्रींच्या 'चंद्रकांता' या हिंदी कादंबरीत आले होते. 'चंद्रकांता'त ऐयार कुठून आले हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. बाळसे धरु लागलेला अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्य प्रकार आता संपुष्टात येतो की काय असे चित्र असतानाच आणि २०१४ वर्ष संपत असताना, किंबहुना गेल्या कित्येक दशकांत प्रकाशित झालेल्या ढीगभर पुस्तकांत "हिरण्यदुर्ग" खरोखर सोन्याच्या तेजस्वितेने तळपणारे पुस्तक आहे.

"हिरण्यदुर्ग" ही एक अद्भुतरम्य कादंबरी आहेच. पण अद्भुतरम्य कादंबरी या साहित्य प्रकारातली मानदंड ठरणारी अशी ही कादंबरी आहे. का आणि कसे ते थोडक्यात सांगतो. आतापर्यंत आपण वाचत आलेल्या कित्येक अद्भुतरम्य कादंबर्‍या भारतीय रुपातल्या असल्या तरी त्या सर्व कादंबर्‍यांचे कथासूत्र बव्हंशी विदेशी व क्वचित इतर भाषेंतील कादंबर्‍यांवरुन घेतलेले होते. अगदी मुळापासून कथासूत्र अस्सल मराठी भाषेतील असलेली अद्भुतरम्य कादंबरी आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही. अद्भुतरम्य कथानकाची निर्मिती करण्यासाठी विलक्षण प्रतिभा लागते. मराठी वाचकांना थरार कथा आणि रहस्यकथा वेगवेगळ्या आहेत याची जाणीव करुन देणारे व थरारकथांचा सम्राट म्हणून ज्यांनी अतिशय तरुण वयात नाव कमावले ते आजचे आघाडीचे व लोकप्रिय लेखक श्री. संजय सोनवणी वाचकांना परिचित आहेतच. या लेखकाने आतापर्यंत अनेक साहित्यप्रकार आव्हान म्हणून स्वीकारले व प्रमाणाबाहेर यशस्वीपणे योगदान देऊन हाडाचा लेखक काय काय करु शकतो याचा जणू एक आदर्शच त्यांनी निर्माण केला आहे. शेकडो लेख आणि शंभराच्या आसपास पुस्तके लिहून एक प्रकारची स्थितप्रज्ञता आल्यावर संजय सोनवणी यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाने अद्भुतरम्य कादंबरी लिहिणे हे मराठी वाचकांचे एक प्रकारचे भाग्यच आहे असे मी समजतो. यापुढेही अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक लिहिल्या जातील. तरीही कथानकाचा सांगाडा व जडण घडण संपूर्णपणे मराठी असलेली मराठीतील पहिली अद्भुतरम्य कादंबरी म्हणून "हिरण्यदुर्ग" कायमच ओळखली जाईल. या प्रशंसेसाठी लेखक श्री. संजय सोनवणी खरोखर पात्र आहेत.

सातवाहनांचा गौरवशाली काळ हा खरे तर महाराष्ट्राच्या व आपल्या देशाच्या इतिहासाचाही मानदंड असायला हवा होता. पण यावर दुर्दैवाने आपल्या संशोधक वा इतिहासकारांकडून म्हणावी तशी भरीव कामगिरी झाली नाही. स्वतः लेखक संजय सोनवणी हे इतिहास संशोधनही करत असल्याने सातवाहनांच्या काळाची पार्श्वभूमी 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीसाठी वापरुन त्यांनी एक प्रकारे वाचकांसाठी महाराष्ट्राच्या सातवाहन राजांच्या वैभवशाली इतिहासाची कवाडेच जणू उघडून दिली आहेत.

हिरण्यदुर्गाच्या गाभार्‍यात आता डोकावून पाहूयात. 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीत असे काय आहे की ज्यासाठी वाचक पुस्तकाला चिकटून राहतो?. अद्भुत, वीर, रौद्र, बीभत्स, भय, रोमांच, थरार, शौर्य, प्रेम, वासना, थरकाप, हिडिस, घृणा, प्रेरणा, चेतना, आशा, निराशा, जय, पराजय, सुष्ट, दुष्ट, हिंसा, अहिंसा, संहार, प्रतिकार, अशा कित्येक प्रकारच्या मनोभावनांचा परिचय वाचकांना "हिरण्यदुर्ग" ही अद्भुतरम्य कादंबरी करुन देते. कादंबरीचे नाव "हिरण्यदुर्ग" असल्यामुळे हिरण्यदुर्ग या कादंबरीत केंद्रस्थानी असणार हे उघड असल्याने या कादंबरीची सुरुवात होते ती सिंहभद्र आणि केतुमाल या दोन आगंतुक प्रवाशांबरोबर. हे दोन्ही प्रवासी वाट चुकून सूर्य मावळल्यानंतर हिरण्यदुर्गाच्या परिसरात येतात आणि त्यांचे खूप आदरपूर्वक स्वागत होते. प्रवासाने थकलेले हे दोघे प्रवासी हिरण्यदुर्गाची श्रीमंती पहात सुग्रास भोजन करुन मदनमंजिर्‍यांच्या गोड सहवासाने रात्री गाढ झोपी जातात. सकाळी दोघे जागे होतात आणि पूर्णपणे हादरतात ते उध्वस्त भिंती... गच्च झुडपांचे रान...  ढासळलेले बुरुज ...असा दुर्ग पाहून. काय असते हिरण्यदुर्गाचे हे भयंकर रहस्य?

पुढे हिरण्यदुर्गाच्या कक्षेतून बाहेर पडून सिंहभद्र आणि केतुमाल हे प्रवास करु लागतात. वाटेत एक गूढ जटाधारी भेटून त्यांना आसरा देतो. त्याच्या साहाय्याने एका गुप्त गुहेच्या मार्गाने दुसर्‍या बाजूने ते  दोघे बाहेर येतात. धनगरांकडुन मिळालेली धक्कादायक वागणूक वाचकांना आश्चर्याच्या गर्तेत ढकलते. खुद्द सिंहभद्र देखील त्या वागणुकीने चक्रावतो. जसजसा त्या निष्पाप व मोकळ्या मनाच्या धनगरांच्या सहवासात राहून सिंहभद्र गोष्टी ऐकत जातो तसतसा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. स्वतःच्या आजच्या अस्तित्त्वाची पाळेमुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या भयंकर संग्रामात दडलेली आहेत हे जाणून स्वतः सिंहभद्र आणि पर्यायाने केतुमालही थरकापतात.

पुढे पुलोम्याच्या सर्व शक्ती जागृत होतात आणि तो प्रकटतो. पुलोमा अवतीर्ण झालाय आणि सिंहभद्र अजूनही स्वतःच्या अस्तित्वाची पाळेमुळे शोधतो आहे. अशा विपरीत अवस्थेत या भयंकर रणसंग्रामाला सुरुवात होते. असंख्य लोहपीसांचा वर्षाव करणारा लोहपक्षी, त्याच्याशी लढणारा सिंहभद्राच्या आज्ञेतील त्रिशूळ. सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच त्याला नष्ट करण्याच्या हेतूने अवाढव्य पर्वतच्या पर्वत उध्वस्त करणारा पुलोमा. पाताळगंगेचे रहस्य, विनाशकारी परिस्थितीत तेर नगरीतील सर्पांच्या राजाकडे सुरक्षित ठेवलेले गूढ आणि रहस्यमयी बाड. ते बाड मिळून सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच पुलोम्याने नागांच्या राणीला आपल्या सापळ्यात अडकवून बाड नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न. बाडाच्या रक्षणासाठी झटणार्‍या शक्तीश्री महाराजांना आलेले अपयश. अशातच गोंधळलेल्या सिंहभद्राच्या आयुष्यात देवसेनेचा अचानक झालेला प्रवेश. पुलोम्याला देवसेनेचा पडलेला मोह. अशा अनेक धक्क्यांमागून धक्के देणारे हे अद्भुतरम्य कथानक वाचकाची उत्कंठा शेवटच्या पानापर्यंत ताणून धरण्यात यशस्वी ठरते.

सिंहभद्र कोण असतो? देवसेना कोण असते? पुलोम्या कसा अवतरतो? सिंहभद्राला जागे करु शकणारे बाड नष्ट होते का? त्यात काय असते? लोहपक्ष्याशी त्रिशूळ कसा लढतो? त्रिशूळ सिंहभद्राच्याच आज्ञेत का असतो? हिरण्यदुर्गाचे रहस्य काय असते? हिरण्यदुर्गाच्या पोटात असे काय रहस्य दडले असते की सर्वशक्तीमान खुद्द पुलोम्याही त्यात प्रवेश करु शकत नसतो? सिंहभद्राला त्याच्या शक्तींचे भान येते का? युद्धात कोण जिंकतो? पुलोम्या की सिंहभद्र? तेर नगरीतील सर्प सातवाहनांच्या चरणी वाहिलेली आपली जन्मोजन्मीची निष्ठा पाळतात का? पाताळगंगेचे रहस्य काय असते?  सातवाहनांच्या राजांची सिंहभद्र आणि पुलोम्या या संघर्षात काय भूमिका असते? सातवाहन ते बाड एवढे का जपत असतात? शक्तिश्री राजाची कन्या देवसेनेचे एक रहस्य काय असते? कुबड्या कोण असतो? त्याचे रहस्यमय वागणे शेवटी कसे उकलते? कोण असतो हिरण्यदुर्गाचा खरा स्वामी? धर्मपाल आणि महाधम्मरक्ख (बौद्ध भिक्खू) सिंहभद्राला कोणती मदत करतात ? शक्तीश्री महाराजांचे एकनिष्ठ सेवक आमोदक आणि गंगाधर बाडासाठी शेवटपर्यंत कसे झुंझतात? हिरण्यदुर्गाच्या परिसराचे रहस्य उकलते का? मरुगण नेमके कोण असतात? ते कोठून आलेले असतात? त्यांचा सिंहभद्राशी काय संबंध असतो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पानोपानी उत्कंठा ताणून धरणार्‍या "हिरण्यदुर्ग" या अद्भुतरम्य कादंबरीतून मिळतात.

अद्भुतरम्य कादंबरी मध्ये धक्का तंत्र प्रभावीपणे वापरणे हे अतिशय मोठे आव्हान असते. आणि त्यात हिरण्यदुर्ग या कादंबरीचे लेखक संजय सोनवणी हे पूर्णत: किंबहुना जास्तच यशस्वी झालेले आहेत. ही कादंबरी वाचताना वाचकाला पानोपानी धक्के बसत जातात. जेव्हा वाचक भानावर येतो तेव्हा लक्षात येते की आपली कादंबरी वाचून पूर्ण झालेली आहे. हेच हिरण्यदुर्ग चे अद्भुत यश आहे. वाचकाला अजून काय हवे असते? हिरण्यदुर्ग वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाच्या मनात उरतो तो एका थरारक व रोमांचकारी प्रवासाचा आनंद. सातवाहन काळातील तेर व प्रतिष्ठान नगरी, सातपुड्याच्या अजस्त्र पर्वतरांगा....निबीड अरण्ये....हिरण्यदुर्गाच्या या अद्भुत विश्वात वाचकाला पुन्हा पुन्हा फिरायला प्रेरित करेन. हिरण्यदुर्ग या कादंबरीमुळे भविष्यात अनेक लेखकांना स्वतंत्रपणे अद्भुतरम्य कादंबरी मराठीतून लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही आणि या अद्भुतरम्य कादंबरीची दखल मराठी साहित्यात मैलाचा दगड म्हणून कायमच घेतली जाईल. 'हिरण्यदुर्ग' चा हा अत्यंत थरारक व रोमांचकारी संघर्षाचा प्रवास वाचकांना नक्कीच आवडेल...

धन्यवाद,
सागर भंडारे

No comments:

Post a Comment