Monday, January 28, 2019

कथासारित्सागर एक अद्भुत प्राचीन ग्रंथ

पुस्तकाबद्दल :


मूळ ग्रंथ बृहत्कथा हा महाकवी गुणाढ्य याने इसवीसना पूर्व पहिल्या ते इसवीसना नंतर पहिल्या शतकाच्या काळात कधीतरी लिहिला याबद्दल विद्वानांत एकमत आहे. महाभारता पेक्षाही श्रेष्ठ असा हा ग्रंथ मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. कथेप्रमाणे राजाने महाकवी गुणाढ्य याला राज्याबाहेर हाकलून दिल्यावर त्याने प्रत्येकी एक लक्ष श्लोक याप्रमाणे सात विद्याधरांच्या कथा रचून प्राकृत पैशाची भाषेत मूळ ग्रंथ लिहिला. राजाने ग्रंथ नाकारल्यामुळे ग्रंथाचे वाचन जंगलात करून तो एकेक पान महाकवी गुणाढ्य जाळत होता. सर्व प्राणिमात्र तहान भूक विसरून हा अद्भुत ग्रंथ ऐकत होते. शिकार्यांना राजासाठी सकस मांस मिळत नसल्यामुळे  राजाने शोध करविला आणि त्याच्या लक्षात महाकवी गुणाढ्य याची महती लक्षात आली. तेव्हा राजाने त्याला थांबवले. तोपर्यंत सहा विद्याधर कथा आग्नेय स्वाहा झालेल्या होत्या. उरलेल्या एक लक्ष श्लोक संख्येची एकच नरवाहन दत्त या विद्याधर राजाची कथा शिल्लक उरली.

पुढे इसवीसनच्या नंतर ११ व्या शतकात काश्मीर येथील एका पंडिताने बृहत् कथेचा संस्कृतात अनुवाद केला. तो आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे आज कथासारित्सागर या नावाने महाकवी गुणाढ्य याची मूळ बृहत् कथा आपल्याला वाचावयास मिळते आहे.

इंग्रज अधिकारी एम. एन. पेंझेर यांना हा अमूल्य ग्रंथ मिळाला. त्यांनीं तो सविस्तर इंग्रजीत दहा खंडांतून अनुवादित केला आहे. मराठीत वरदा प्रकाशन च्या ह. अ. भावे यांनी ५ खंडांत कथासरित्सागर मराठीत आणले आहे. याही आधी मराठी अनुवाद उपलब्ध होते. पण ते जुन्या मराठीत आणि संक्षिप्त केले असल्यामुळे कालबाह्य झाले होते. दुर्गा भागवत यांची अत्यंत अभ्यासपूर्ण सविस्तर प्रस्तावना हेही या कथासारित्सागर च्या अनुवादाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणतीही कथा वाचली तरी अत्यंत आनंद मिळतो. अवश्य वाचावे असे हे ५ खंड आहेत.


Wednesday, January 16, 2019

"पडद्याआड" - सुहास शिरवळकर यांनी एक गुंतागुंतीची रहस्यकथा



पुस्तकाचे नाव , त्याचे मुखपृष्ठ आणि कादंबरी यांचा परस्पर संबंध अतिशय समर्पकपणे आढळून येणाऱ्या मोजक्या लेखकांत सुहास शिरवळकर यांच्या समावेश होतो.
पडद्याआड चेच बघा ना. पडद्याआड लपलेल्या व्यक्तीचे फक्त बुट घातलेले पाय दिसतात. पूर्ण कादंबरी वाचून झाल्यावरच हे मुखपृष्ठ किती समर्पक आहे हे वाचकांना अवश्य जाणवते. कारण संपूर्ण कादंबरी याच घटनेच्या अवती भवती फिरत राहते.
आता बघुयात पडद्याआड नेमके काय काय दडले आहे ज्यामुळे वाचकांना ही कादंबरी वाचायचा अनिवार मोह झालाच पाहिजे
कादंबरी सुहास शिरवळकर यांचा मानसपुत्र अमर विश्वास याची असल्यामुळे कोर्ततले सीन आणि वेगवान शोध मोहीम या कादंबरीच्या गाभ्यात असणार हे उघड आहे. पण पडद्याआड ही सर्वार्थाने इतर अमर कथांपेक्षा जरा वेगळी ठरते. पाहुयात काय आहे या पडद्याआड.
जिमी आणि रणजित दोघा अट्टल बदमाशांची जुगारात केलेल्या हातचलाखी मुळे मारामारी होते त्यात रणजित जिमी आणि त्याच्या चेल्यांची जबरदस्त धुलाई करतो. लोळा गोळा होऊन पडलेल्या जिमी समोरून पैसे घेऊन रणजित बेफिकीर पणें निघून जातो. तेव्हाच जिमी ठरवतो की रणजित चां काटा काढायचा.
कोण असतो रणजित?
भैय्या सारंग याची कलकत्त्यात गॅंग असते. आणि त्याचा रणजित महत्त्वाचा माणूस असतो. काहीतरी गडबड करून रणजित भैय्या सारंग चां एक स्मगलिंग चां लॉट घेऊन मुंबईला पळून येतो. मुळातच अट्टल बदमाश असलेला रणजित मजेत आणि बेफिकीर आयुष्य जगत असतो. जिमी शी झालेला प्रसंग रणजित विसरलेला असतो. अशा कितीतरी जिमींना त्याने आगोदर संपवलेले असते त्यामुळे असल्या चिल्लर गुंडांना रणजित घाबरण्याचे कारणही नसते.
अचानक एकदा त्याच्या कारचा पाठलाग होतो. एकूण पाच जण असतात. सहज त्याला जिमी आठवतो. स्वतःच्या अपार्टमेंट मध्ये जाऊन रणजित वाट बघत असतो. पाचही जण गुपचूप फ्लॅट मध्ये येतात. बेडरूम मध्ये रणजित पहुडलेला बघून अंधारात सगळे आपापले सुरे घेऊन त्याला सर्वत्र भोसकतात. आणि काम झाल्याची  खात्री पटताच निघून जातात. लपलेला रणजित बाहेर येऊन स्वतःशी बोलू लागतो. पुन्हा एकदा त्याच्या रबरी बाहुली ने त्याला वाचलेले असते. आता रणजित निर्धास्त होतो आणि बेडवर आडवा होऊन झोपून जातो. बऱ्याच वेळाने पडद्याआड एक हालचाल होते. पडद्याआड लपलेली व्यक्ती बाहेर येते आणि रणजित च्याच उशाखालचे साइलेंसेर लावलेले रिव्हॉल्व्हर पकडून तीन शॉट्स रणजित च्याच डोक्यात झाडते.
आत्महत्या दाखवण्यासाठी ट्रिगर वरती रणजित चां हात ठेवून देते. इतक्यात दार वाजते. खुनी माणूस दार उघडतो तर दारात सॉलोमन (रणजित चां शेजारी) असतो. खून करण्या ऐवजी त्याचा चेहरा पाहिल्यामुळे खुनी सॉलोमन ची जीभ कापतो आणि डोळे काढून ठेवतो. आता खून्याचे वर्णन सॉलोमन करू शकणार नसतो.
अशी एकूण सुरुवात होते. मध्येच अनेक पात्रे उगवतात... रणजित ची प्रेयसी फरियास ... तिचे मादक सौदर्य... ती जिमीच्या बार मध्ये कॅब्रे डान्सर का असते ? जिमी आणि रणजित ची लढाई पूर्वनियोजित असते का ? रणजित चां बॉस भैय्या सारंग त्याच्या मागावर असतो का ? त्याचा स्मग्लींग चा माल रणजित कडे सापडतो का ? सोनेरी पेंटिंग्ज चे रहस्य काय असते ? रणजीत च्याच बिल्डिंग मध्ये राहणारी अरळकट्टी कोण असते ? तिच्याकडे येणार्यांकडे वॉचमन दुर्लक्ष का करत असतो ?
रणजित च्या खुनाचे कोडे सुटते का?
बॅरिस्टर अमर, गोल्डी, इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल यांना खुनाचा गुंता सोडवता येतो का ? इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल याला अचानक सस्पेंड का केले जाते ? आपल्या मित्राला वाचवण्यासाठी अमर यशस्वी होतो का? रातोंका राजा अवतरतो तेव्हा कोणालाही न सुटलेलं कोडं तो सोडवू शकतो का ? उस्मान चाचा ची झोपडी या संपूर्ण केस मध्ये महत्त्वाची का ठरते ? असल्या मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे पडद्याआड वाचून सुशिंच्या वाचक प्रेमींना मिळतील.
पडद्याआड चे वैशिष्ट्य हे आहे की रातों का राजा , गोल्डी , इन्स्पेक्टर लाल, मोहिनी आणि मास्टर ब्रेन बॅरिस्टर अमर विश्वास यांच्या मेंदूची कसोटी लागते. मिस  फरीयास अमरला गुंडळते का ? की अमर एका भयानक चक्रव्यूहात अडकतो ? त्यातून तो सुटतो की नाही ? भैय्या सारंग हे महत्त्वाचे पात्र असून या पात्राचे हादरवून टाकणारे सत्य काय असते ? अशा जबरदस्त वातावरण निर्मिती करणारी आणि वाचायला हवीच अशी कादंबरी म्हणजे पडद्याआड.
वाचा आणि अभिप्राय अवश्य कळवा.
धन्यवाद.
- सागर भंडारे