Friday, July 31, 2015

जी,ए.कुलकर्णी यांच्या "रमलखुणा" च्या अर्पणपत्रिकेचे मर्म

जी,ए.कुलकर्णी यांच्या "रमलखुणा" च्या अर्पणपत्रिकेचे मर्म

जी.ए.कुलकर्णी  यांच्या "रमलखुणा" या अवघ्या दोनच पण दीर्घकथा असलेल्या सुंदर पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतच जी.एं.ची गुंफण सुरु होते.
अवघ्या एका ओळीची अर्पणपत्रिका पण मनांत उत्सुकता निर्माण करणारी. 


   "बेळगांव नावाच्या गावास....पावले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती सतत जवळ राहिली आहे..." 



रमलखुणाच्या अर्पण पत्रिकेत आलेल्या बेळगांव या गावाबद्दलच्या ओळीमुळे जी.एं.बद्दल आलेल्या थोड्या गोष्टी येथे सांगणे अवश्य वाटते. कारण त्याशिवाय रमलखुणाच्या अर्पणपत्रिकेची उकल होणार नाही. 
बेळगांव येथील जी.एं.चे वास्तव्य हे क्लेशदायक होते. त्यामुळे जी.ए. पुढे धारवाडला स्थायिक झाले. बेळगांव मधील अनुभवांतून बेळगांवबद्दल जी.एं.च्या मनात एक अढी बसली. इतकी की त्यामुळे मधे एका कोर्टाच्या कामासाठी बेळगांवला जावे लागले असता त्यांनी गावात पाऊलही टाकले नाही. जी.एं.ची पुढील वाक्ये त्यांच्या या वेदनेचा प्रत्यय देतील. जसे,
"काही घरांनाच शापित चेहरा असतो की काय कुणास ठाऊक?"


"आपणाला मिळालेले आयुष्य पुन्हा जसेच्या तसेच जगण्याची तयारी असलेली माणसे भाग्यवानच म्हटली पाहीजेत. मी त्या भाग्यवंतांपैकी नाही"



"एखाद्या फरारी गुन्हेगाराला पकडण्यासाठी शिपाई टपून असावेत, त्याप्रमाणे तेथे जुन्या आठवणी टपून आहेत. खरे सांगायचे म्हणजे त्या आठवणींची जन्मठेप झालेलाच मी एक माणूस आहे" 

 

विजया राजाध्यक्ष यांना लिहिलेल्या एका पत्रात जी.एं.नी त्यांच्या या वेदना मांडलेल्या आहेत. 'जी.एं.ची निवडक पत्रे - खंड -४ मध्ये त्या सविस्तरपणे वाचायला मिळतील'.
याच पत्रात जी.एं.नी रमलखुणाच्या अर्पणपत्रिकेचे मर्मही सांगितले आहे. 

 
"मी माझे एक पुस्तक बेळगावला अर्पण केले आहे. त्यात माझा स्वतःचा एक अर्थ म्हणजे ते केवळ अर्पण नसून तर्पण आहे, असा आहे" 


जी.एं.च्या गारुडाचा हा प्रवास चालूच राहणार आहे. 
या अर्पण पत्रिकेवर लेखनाचा योग आला तो आमचे अशोक पाटील काका यांच्यामुळे. जी.ए.कुलकर्णींवर अधिकारवाणीने फेसबुकवर त्यांनी एक भरगच्च लेख लिहिला व त्यामुळे मी हे तोडलेले थोडेफार तारे. एवढेच. बाकी रमलखुणाची सगळी जादू जी.एं.ची