Wednesday, December 19, 2012

शिवरात्र - नरहर कुरुंदकर





सध्या शिवरात्र हे नरहर कुरुंदकरांचे पुस्तक वाचतो आहे. खरे तर मी सहसा पुस्तक पूर्ण न वाचता समीक्षण म्हणा वा परिचय म्हणा कधीही लिहित नाही. पण केवळ सुरुवातीच्या ५० पानांतच कुरुंदकरांनी वैचारिक क्षमतेवर जे धक्क्यांमागून धक्के दिले आहेत. त्यामुळे शिवरात्रचा परिचय लिहिणे क्रमप्राप्त आहे.

पुस्तक एकूण तीन भागांत आहे. सुरुवातीच्या भागात कुरुंदकरांनी मुख्य भर दिला आहे तो हिंदुत्वाचे प्रवर्तक व मार्गदर्शक गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधीजी यांच्यातील वैचारिक फरक यावर. कुरुंदकरांच्या तर्कशुद्ध विचार मांडण्याच्या पद्धतीमुळे स्तिमित व्हायला होते.



वादग्रस्त मुद्दे आहेत. पण तरी लिहितोच.
गांधींवर जो मुस्लिमधार्जिणा संघाकडून आरोप केला जातो तोच मुळात चुकीचा कसा आहे हे कुरुंदकर या पुस्तकात सिद्ध करुन दाखवत आहेत.
प्रत्यक्षात गोखले व टिळक हे जेव्हा काँग्रेसमधे होते तेव्हाच त्यांनी मुस्लिमांशी विभक्त मतदारसंघाचा करार केला होता - ज्यामुळे देशाची फाळणी गांधीजी टाळू शकले नाहीत.  प्रत्यक्षात त्यानंतर गांधीजींनी मुस्लिमांशी असा एकही करार केलेला नाही. त्यामुळे फाळणी टाळण्याच्या वेळी गांधीजींना आलेल्या अपयशाची मीमांसाही कुरुंदकरांनी परखडपणे केली आहे. गोखले - टिळकांच्या धोरणांमुळे झालेल्या नुकसानाचीही चिकित्सा केली आहे.
तसेच गांधीजी हे नेहमीच हिंदूंचे नेते होते व मुसलमानांचे नव्हते असेही ठाम प्रतिपादन मुद्द्यांच्या आधारे त्यांनी केले आहे. मुसलमानांनी कायमच गांधींना विरोध केला होता. त्यांच्याशी गांधीजी नेहमीच गोड बोलत होते पण प्रत्यक्षात करार त्यांनी एकही केलेला नव्हता. यामागची गांधीजींची भूमिकाही कुरुंदकरांनी स्पष्ट केली आहे.

तसेच हिंदुत्त्ववाद्यांचा दम फक्त बोलण्यात होता व कृतीत त्यामानाने नगण्य होता. अशीही चिकित्सा कुरुंदकरांनी केली आहे.
उदाहरणार्थ - स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात हिंदुत्ववाद्यांनी मुळात असे कोणते लढे लढले? तर याचे उत्तर एकही नाही हे कुरुंदकर 'शिवरात्र' मधे सिद्ध करतात. अगदी हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात गांधीजींच्या शब्दाने ज्या गोष्टी झाल्या त्यावेळी हिंदुत्त्ववाद्यांनी कोणतीही कृती केली नाही. त्यामुळे केवळ हिंदुत्त्ववादाचे विचार लोकांना पाजून व कृती न करणार्‍यांना गांधीजींच्या निर्णयांचे मूल्यमापन करण्याचा अधिकार नाही...इ..इ... अशा अनेक स्पष्ट व सिद्ध करणार्‍या दाखल्यांनी मन सुन्न होऊन गेले आहे.
फक्त ५० पानेच वाचून झाली आहे. पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर कदाचित त्यावर सविस्तर लिहिन. तूर्तास छोटेसे पुस्तक पण आवाका अगदी प्रचंड आहे अशी सध्याची परिस्थिती आहे.


सत्य हे कठोर असते हेच खरे. मला त्यांचे बरेचसे मुद्दे पटले. सुदैवाने मी गोविंद तळवलकरांची 'सत्तांतर' सिरिज, फ्रीडम ऑफ मिडनाईट, तत्कालीन राजकारण्यांच्या भूमिकांचे व निर्णयांची मीमांसा करणारी पुस्तके, फाळणीपूर्व भारतातील घटनाक्रम व राजकारण यांच्यावर वा तत्सम अनेक पुस्तके वाचली असल्याने कुरुंदकरांच्या मांडणीतली खोली लगेच जाणवली.
गांधीजींनी १९३४ सालीच काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा त्याग केला होता. असे असूनही भारतीय जनमानसावर गांधीजींची असलेली पकड, प्रभाव व ते राष्ट्रपिता का ठरले यावर नरहर कुरुंदकर यांची चिकित्सा जबरदस्त आहे.गांधीजींना आपण राष्ट्रपिता का मानतो? याची सर्व बाजूंनी जी मांडणी त्यांनी केली आहे ते पाहून खरोखर अचंबा वाटतो.

खरे तर शिवरात्र मधील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हायला हवी. कुरुंदकरांच्या या तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेल्या मुद्द्यांच्या वाचनानंतर गांधीजी हे हिंदूंचेच नेते होते यात शंका उरत नाही. इतिहासाचा हा वेगळा पैलू वाचकांना नक्कीच चिंतन करण्यास भाग पडेल. भाग २ व ३ मध्ये काय आहे ते सविस्तर नंतर पाहूयात.

 कुरुंदकरांची 'जागर' व 'धार आणि काठ' ही देखील याच पठडीतील पुस्तके आहेत. अर्थात विषय थोडे वेगळे आहेत. कुरुंदकरांच्या तर्कशुद्ध चिकित्सा पद्धतीचे तुम्ही एकदा फॅन झालात की त्यांचे प्रत्येक पुस्तक ही एक पर्वणी ठरते. 'मनुस्मृती' हाही त्यांचा असाच अप्रतिम ग्रंथ आहे. पण बाजारातून तो अदॄश्य होऊन बहुतेक दशक होत आले आहे.


धन्यवाद,
सागर


पुस्तकाचे नाव : शिवरात्र
लेखक : नरहर कुरुंदकर
प्रकाशक : देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.
पृष्ठसंख्या : १८६
किंमत : रु.२००/-



Sunday, October 14, 2012

काश्मीर: धुमसते बर्फ



काश्मीर: धुमसते बर्फ

लेखक - जगमोहन 
हा काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल ,माजी सनदी अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री श्री. जगमोहन यांच्या मूळ "My Frozen Turbulence in Kashmir" या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. हा अतिशय वेधक ग्रंथ, इतिहासाचा वेध घेत, ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर करतो. नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी किती विस्तृत विषयांचा परामर्श यात घेतला आहे याची कल्पना येते. वैशिष्ट्य हे की या सर्व प्रश्नांचं विश्लेषण करताना त्यांनी कुठेही कशाचाही आग्रह धरलेला नाही. लेखकापाशी ज्याचा अकाव्य पुरावा नाही तो मुद्दा त्यांनी मांडलेला नाही.घोंघावत येत असलेल्या वादळाचे 'धोक्याचे इषारे' कसे उपेक्षिण्यात आले आणि त्याचे परिणाम किती महाभयंकर झाल्रे ते त्यांनी अत्यंत कळकळीने पटणाऱ्या शैलीत मांडले आहे. सखोल अंतर्दृष्टीने मुलभूत प्रश्नाच्या मुळाशी जाऊन श्री.जगमोहन यांनी 'बोटचेप्या' व 'खपवून घेणाऱ्या अनुज्ञा-धोरणापायी' काय काय भोगावे लागत आहे ते निर्भीडपणे मांडलंय. भ्रम पाळण्याची मनोवृत्ती, कठोर वास्तवांना सामोरे जाण्याऐवजी बनवाबनवी आणि फसवाफसवीचं व दुटप्पीपणाचं राजकारण कसं होत गेलंय, दुबळं प्रशासन व सरकारातील भ्रष्टाचार यांच्यामुळे काश्मीर व केंद्र यांच्यातील संवैधानिक संबंध विघटनवादास प्रोत्साहन देण्यास कसे कारणीभूत होत आहेत आणि एकंदरच नकारात्मक वृत्ती-प्रवृत्ती कशा कार्यरत आहेत याचा अतिशय चिंतनिय असा ताणाबाणा या पुस्तकात विणला आहे. दहशतवादाचं पाशवी स्वरूप आणि विद्रोहाचे चित्र फारच चिंतनशील मनीषीप्रमाणे लेखकानं रेखाटलं आहे.भारतीय राजकारणातील गोंधळ आणि अंतर्विरोध यांचं लेखकानं केलेलं विश्लेषण व वर्णन अंतर्मुख करणारे आहे. विपर्यास आणि विकृत यांचं चित्र फार मार्मिकपणे दाखवून दिले आहे. वरपांगी विचार करणारे हितसंबंध कोणता खेळ खेळत आहेत ,ते त्यांनी क्ष किरण यंत्रासमोर उभे राहिल्यावर दिसते तितक्या स्पष्टपणे बिनचूक दाखवून दिलं आहे. ते अत्यंत हिरीरीने आपल्याला सांगतात की समस्या अतिशय जटिल आहेत, जुनाट आहेत आणि देशाच्या भावविश्वात खोलवर रुजलेल्या आहेत. काश्मीर हे अत्यंत खडतर आव्हान फक्त सुधारीत आणि परिष्कृत भारतच पेलू शकेल, असा भारत की ज्याच्यापाशी 'उद्या' चा वेध घेणारी दृष्टी आहे व वास्तवाचं भान ठेवून व्याहारिक उपाय योजण्याची जिद्द आहे. श्री.जगमोहन हे एक जोमदार कृतीशील आणि गहन चिंतनशील व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाचा ठसा त्यांच्या या आगळ्या वेगळ्या ग्रंथाच्या पानोपानी आढळतो.

पहिली आवृत्ती - १९९२
पाचवी आवृत्ती - १९९७
नवी अद्ययावत केलेली सहावी आवृत्ती येत्या २१ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रकाशित होत आहे.  



Price: Rs.700/-
Pre-Publication Discount: Rs.200/-
Additional Discount: Free Shipping.
Book your copy now with Free Shipping
किंमत - Rs. 500.00

Friday, September 14, 2012

पुस्तकांची खरेदी ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळे


नमस्कार पुस्तकप्रेमींनो,

अलिकडच्या काळात ऑनलाईन खरेदी हा पर्याय उपलब्ध झाल्यापासून आपल्यापैकी अनेक वाचनप्रेमी स्वतःच्या आवडीच्या पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी झटू लागले आहेत. मी ही त्याला अपवाद नाहिये. या छोट्याशा लेखाद्वारे वाचकांना मराठी पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी कोण-कोणते पर्याय उपलब्ध आहेत? पुस्तके विकत घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? ऑनलाईन खरेदी करताना कोणती सुरक्षितता बाळगावी? व एक ग्राहक म्हणूनही अधिकाधिक स्वस्तात आपल्याला हवी असलेली पुस्तके कशी मिळवावीत? याकडे वाचकांचे थोडे लक्ष वेधू इच्छितो.
सर्वप्रथम ऑनलाईन खरेदी करण्यासाठी कोणकोणती संकेतस्थळे उपलब्ध आहेत ते पाहूयात.

१. बुकगंगा :
http://www.bookganga.com/eBooks/
देशातील खरेदीसाठी


२. फ्लिपकार्ट : http://www.flipkart.com/books/marathi?_pop=flyout
देशातील खरेदीसाठी






३.  मायहँगआऊट स्टोअर  : http://www.myhangoutstore.com/
देशातील खरेदीसाठी




४. ग्रंथद्वार :http://www.granthdwar.com/
देशातील खरेदीसाठी


५. अक्षरधारा : http://www.akshardhara.com/
देशातील खरेदीसाठी (फक्त फोनवरुन)



६. रसिक साहित्य : http://www.erasik.com/books/page1/
देशातील खरेदीसाठी










७. रसिक : http://www.rasik.com/
विदेशातील खरेदीसाठी



८. मीमराठी शॉप  : http://shop.mimarathi.net/

देशातील खरेदीसाठी


९. मायबोली  : http://kharedi.maayboli.com/shop/home.php
देशा-विदेशातील खरेदीसाठी









१०. सह्याद्री बुक्स : http://www.sahyadribooks.org/
देशातील खरेदीसाठी














खरेदी कशी करावी?

१. खरेदी करताना वरील सर्व संकेतस्थळे एक संपर्क क्रमांक पुरवितात. त्यावर आधी फोन करुन पुस्तकांची उपलब्धता तपासून घ्या मगच ऑर्डर तयार करा.

२. ऑर्डर देण्यापूर्वी आपल्याला उत्तम किंमत / सवलत कोण देत आहे ते आधी तपासून पहा. म्हणजे कोणी विक्रेता सवलत जास्त देतो पण शिपिंग चार्जेस परवडत नाही तर कोण शिपिंग फुकट देतो. या सर्व बाबी तपासून मगच आपल्या ऑर्डरची किंमत ठरवा.

सुरक्षितता:

ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षितता हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. वरील सर्व संकेतस्थळांवरुन मी स्वत: खरेदी करुन सुखद अनुभव घेतलेला आहे. शिवाय पैसे खात्यात ट्रान्सफर करण्याची सेवा अनेकांनी दिली आहे याचा फायदा क्रेडिट कार्डवरच्या व्यवहारावर प्रोसेसिंग चार्ज वाचवून घेता येतो. अनेक साईट्स क्रेडिट कार्डावर कर नाही घेत. तेव्हा ही बाब देखील तपासून घेणे गरजेचे ठरते.

सवलत:
तेव्हा वरील सर्व संकेतस्थळांवरुन खरेदी करताना अनुभव हा महत्त्वाचा ठरतो. सातत्याने खरेदी करुनही तुमचे विक्रेत्यांशी नियमित ग्राहकाचे संबंध निर्माण होतात ज्याचा फायदा तुम्हाला सवलतींच्या रुपाने मिळतो.

ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी काही संकेतस्थळे संपर्क क्रमांक देतात हे मी अगोदर लेखात सांगितले आहेच.
तर अशा वेळी फोनवरुन संभाषण करताना तुमचे एक चांगला ग्राहक या नात्याने त्यांच्याशी संबंध प्रस्थापित होतात.
चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने या छोट्याशा बाबी बर्‍याच वेळा महत्त्वाच्या ठरतात.
बुकगंगा, रसिक साहित्य, मीमराठी शॉप, ग्रंथद्वार यांच्याकडून मी हा अनुभव अनेक वेळा घेतला आहे.
किंबहुना तुम्हाला हवी असलेली पुस्तके उपलब्ध आहेत का? अशी विचारणा केली तरी वरील ऑनलाईन विक्रेत्यांनी लगेचच पुस्तकांची उपलब्धता कळवलेली आहे.
बुकगंगा सेवे बाबत अतिशय तत्पर आहे. ऑर्डरपैकी एखादे पुस्तक उपलब्ध नसेल तर त्या रकमेचे डिस्काऊंट कुपन तुम्हाला लगेच पाठवले जाते. म्हणजे पुढच्या खरेदीच्या वेळी त्याचा उपयोग तुम्ही करु शकता. डिस्काऊंट कुपन नको असेल तर फोनवर बोलून व फरकाची रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करुन दुसरे पुस्तक मागवू शकता.
रसिक साहित्य ही कस्टमर बेस्ड फोकस करुन सेवा देणारी संस्था आहे. त्यामुळे फक्त ईमेल मार्फत तुमची ऑर्डर देऊ शकता व त्याचे बिल ते ईमेल करतात. पैसे खात्यावर ट्रान्सफर केले की लगेच २-३ दिवसांत पुस्तके (मी बंगळूरात असूनही) मिळतात. असा माझा अनुभव आहे.
ग्रंथद्वारला फेसबुक वा ट्विटरद्वारे पुस्तकांची विचारणा केली व लगेच त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर ती पुस्तके उपलब्ध करुन दिलीत.
मीमराठी शॉप देखील रसिक साहित्य सारखी ऑनलाईन बरोबर फोनवर ऑर्डर घेण्याची सेवा देखील पुरवते. फ्री डिलिव्हरी व इतर ऑफर्सदेखील वेळोवेळी त्यांच्या संकेतस्थळावर बघायला मिळतात.

धन्यवाद,
सागर

Saturday, August 18, 2012

"प्रे (सावज)" एक थरकापवून टाकणारी विज्ञान कादंबरी


पुस्तकाचे नावः प्रे (सावज)
मूळ लेखकः मायकल क्रायटन

अनुवादकः प्रमोद जोगळेकर
प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत : रु. ३००/-

मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये.

जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्‍या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्‍यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच. पण त्याच्या जोडीला तो विज्ञान आणि निसर्गाचे नियम यांची अशी जबरदस्त तर्कशुद्ध जोड देतो की त्याच्या कादंबर्‍या या कल्पना वाटतच नाहीत. तर अगदी जवळच्या काळात हे सर्व वास्तवात येणार आहे असे वाचकाला मनोमन वाटून देण्यात तो कमालीचा यशस्वी झालेला आहे. थरारक कादंबर्‍यांमधून वाचकांचे सोप्या भाषेत ज्ञान संवर्धन करणे ही एक अत्भुत कला फार कमी लेखकांकडे असते. अशा हाडाच्या लेखकांपैकी मायकल क्रायटन आहे असे म्हटले तर ते योग्यच ठरेल.


असो... लेखकपुराण पुरे करतो आणि आता आपण मायकल क्रायटनच्या "प्रे (सावज)" या कादंबरीकडे वळूयात.

सर्वात आधी कादंबरीच्या नावाची थोडी उकल करतो. "प्रेड-प्रे" (प्रेडेटर-प्रे अर्थात "शिकारी-शिकार") या मूळ शब्दातून या कादंबरीचे साजेसं व समर्पक नाव लेखकाने दिलेले आहे हे कादंबरी वाचतानाच वाचकाला जाणवत राहतं. कादंबरीच्या गाभ्याशी आहे ते नव्याने उदयास आलेले नॅनो तंत्रज्ञान. नॅनो तंत्रज्ञानामुळे काय होऊ शकेल हे या कादंबरीत अतिशय छानपणे व कारणांसहित सर्वसामान्य वाचकाला सहज कळते. ही कादंबरी वाचताना फक्त एक आठवड्यांतील अत्यंत वेगवान घटनाक्रमाचा थरार वाचक अनुभवणार आहे, तेव्हा थोडक्यात कादंबरीबद्दल सांगतो.

तर या कादंबरीची सुरुवात होते ती कादंबरीचा नायक जॅक आणि त्याची पत्नी ज्युलिआ यांच्यापासून. जॅक एक उत्कृष्ट दर्जाचा संगणकातले प्रोग्रॅम्स तयार करणारा तज्ज्ञ असतो. आणि त्याने तयार केलेल्या प्रेड-प्रे (शिकारी=शिकार) तत्त्वावर बेतलेल्या मल्टी-एजंटच्या प्रोग्रॅम्सची कोणीतरी चोरी करतो. त्यामुळे त्याच्या कंपनीतून त्याला नोकरी गमवावी लागते व गेले सहा महिने तो बेकार असतो. अशा परिस्थितीत जॅकची पत्नी झायमॉस टेक्नॉलॉजीज् या कंपनीत काम करत असते व गेले काही आठवडे ती अतिशय व्यस्त झालेली असते. अशा परिस्थितीत जॅक या दांपत्याची नऊ महिन्यांची मुलगी अमाण्डा, आठ वर्षांचा मुलगा एरिक व बारा वर्षांची मुलगी निकोल या तिघांना अतिशय छान संभाळत असतो. पण कथानकाला सुरुवात होते तीच मुळी जॅकची पत्नी ज्युलिआच्या विक्षिप्त वागण्याने. जॅकला कळत नसते की ज्युलिआ असे का वागते आहे. बाहेरुन आल्यावर कधीही शॉवरखाली स्नान न करणारी ज्युलिआ ऑफिसातून आल्यावर स्वतःच्या नऊ महिन्याच्या मुलीला हातही न लावता आधी स्नान करु लागते. मग ज्युलिआ जॅकला एक व्हिडिओ डेमो दाखवते. झायमॉस टेक्नॉलॉजीला अमेरिकेच्या पेन्टॅगन या संरक्षण व्यवस्था पाहणार्‍या सरकारी संस्थेकडून एक कंत्राट मिळालेले असते. शत्रूच्या परिसरात जाऊन हवेतून हवी ती छायाचित्रे मिळवण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करोडो कॅमेर्‍यांचा समूह तयार करायचा अशा प्रकारचे ते काम असते.

ज्युलिआचे वागणे दिवसेंदिवस संशयास्पद होऊ लागलेले असते. ती ड्रायव्हिंग करताना तिच्या शेजारच्या सीटवर कोणीही नसते, त्यानंतर गाडी वळताना जॅक त्याच सीटवर एका माणसाला पाहतो. तेथून जॅकची चलबिचल सुरु होते. ज्युलिआचे कोणाशी अफेअर तर नाही ना? हा संशय बळावतो. मुलगी निकआई, मुलगा एरिक व छोटीशी अमाण्डा आपल्या आईचे बदललेले वागणे लगेच ओळखतात व त्यांना तिच्याबद्दल ममता वाटेनाशी होते. ज्युलिआ एवढी बदललेली असते की अमाण्डा का रडते आहे हेही अनेकदा तिच्या लक्षात येत नाही, अशा वेळी जॅक पुढे होऊन अमाण्डाला शांत करत असतो. दिवसेंदिवस ज्युलिआचे चिडचिडेपण वाढत असते. तसेच जॅकचाही संशय बळावत जातो की ज्युलिआचे ऑफिसमधील कोणाशी तरी अफेअर चालू आहे. मग तो सल्ला घेण्यासाठी आपल्या बहिणीचा सल्ला घेतो. फोनवर बोलताना त्याची बहीण एलेन त्याच्या मदतीसाठी त्याच्या घरी यायचे स्वतःच घोषित करते आणि जेणेकरुन कोर्टात घटस्फोटाची केस दाखल झाली तर जॅकची बाजू बळकट राहीन व तिन्ही मुले जॅककडेच राहतील.

पुढे या प्रयोगात काहीतरी गोंधळ होतो व चूक होते. त्या चुकीला निस्तरण्यासाठी जॅकलाच मदतीसाठी त्याच्या जुन्या कंपनीतून सल्लागार म्हणून पाचारण करण्यात येते. (जॅकची जुनी कंपनीच झायमॉसला तंत्रज्ञ पुरवत असते. झायमॉस टेक्नॉलॉजीमध्ये जॅकचे प्रोग्रॅम्स वापरले गेले आहेत हे तोपर्यंत त्याच्या लक्षात आलेले असते. पण तरीसुद्धा प्रॉब्लेम काय आहे हे त्याला स्पष्टपणे शेवटपर्यंत कोणीही सांगत नाही. ही ऑफर स्वीकारावी की नाही या द्विधा मनःस्थितीत जॅक असतो. पण त्या परिस्थितीत जॅकची पत्नी ज्युलिआचा अपघात होतो व तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागते. अशा परिस्थितीत जॅकवर घराची जबाबदारी पण आलेली असते. जॅक त्याची बहीण एलेनावर जबाबदारी सोपवून झायमॉसची ऑफर स्वीकारतो व ताबडतोब नेवाडातील वाळवंटात असलेल्या झायमॉस च्या अवाढव्य प्रकल्पाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतो. त्यावेळी केवळ एक आठवड्यात अतिशय वेगवान व नाट्यमय घटनाक्रमाचा तो सूत्रधार असणार आहे हे त्यावेळी त्याला अजिबात जाणवलेले नसते.

झायमॉसच्या प्रकल्पापाशी पोहोचताच त्याला धोक्याची जाणीव होते. त्याचा खास मित्र रिक तेथे असतो हे पाहून त्याला बरे वाटते. आधीच्या कंपनीतून जॅकला हाकलून देण्यापूर्वी त्याच्या टीमचे सर्व सदस्य झायमॉसच्या या प्रकल्पावर काम करत असतात. नॅनो तंत्रज्ञान वापरुन केसाच्याही जाडीपेक्षा अत्यंत सूक्ष्म आकाराचे नॅनो रोबो तयार करुन त्यांचे काम एकत्रित रित्या एका थव्यासारखे करवून घेण्यासाठी जॅकच्या मूळ प्रोग्रॅम्सचा वापर या प्रकल्पात झालेला असतो. आकाराने अतिशय लहान असल्यामुळे वाळवंटातील वेगवान वार्‍यांत या नॅनोकणांच्या थव्याचा टिकाव लागत नसतो. पेन्टॅगॉनने या समस्येवर झायमॉसला उत्तर मिळणार नसेल तर प्रकल्पासाठीचा पैसा ताबडतोब थांबवण्याची धमकी दिलेली असते. त्यामुळे झायमॉसपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला असतो. जॅक एका सल्लागाराच्या भूमिकेत झायमॉसच्या नेवाडा वाळवंटातील प्रकल्पात गेलेला असतो (जिथे त्याची पत्नी देखील ज्युलिआ कित्येक दिवस काम करत असते). पत्नीचा प्रियकर कोण आहे हे शोधून काढायच्या हेतूने जॅकने ही ऑफर स्वीकारलेली असते. पण पुढील वेगवान घटनाक्रम जॅकला सत्य काय आहे ते दाखवतो.

नेवाडाच्या वाळवंटातील झायमॉसच्या या प्रकल्पात पाय ठेवताक्षणीच जॅकचे स्वागत अतिशय वेगवान हवेच्या मार्‍यांनी त्याला शुद्ध करणार्‍या बंद खोलीवजा प्रवेशद्वारापासून होते. विंस नावाच्या व्यक्तीशी परिचय झाल्यावर पुढे जॅकला त्याचा चांगला मित्र रिक भेटतो, तो पुढे प्रकल्पातील इतरांशी ओळख करुन देतो. रोझी कास्ट्रो, डेव्हीड ब्रूक्स, बॉबी लेम्बेक, मे चॅंग , चार्ली डेव्हनपोर्ट अशा लोकांशी जॅकची ओळख होते.

नॅनोकणांचा एक ढग चुकून हवेत निसटला आहे असे रिक जॅकला सांगतो आणि त्यांच्यात स्वतः शिकणार्‍या एजंटचा प्रोग्रॅम बसवलेला असल्यामुळे आणि जैवतंत्रज्ञानाची जोड देऊन स्वतःचे पुनरुत्पादन करण्याची क्षमता दिलेली असल्यामुळे हा थवा हळूहळू अत्यंत घातक झालेला असतो. याची प्रचिती एका सशाची शिकार किती सूत्रबद्ध व योजनाबद्ध पद्धतीने हा नॅनोकणांचा थवा करतो तेव्हा जॅकला येते. पुढे जॅकला असेही लक्षात येते की या नॅनोकणांच्या ढगाचे आयुष्य फक्त ३ तासांचे असते. पण त्यांच्यात पुनरुत्पादन क्षमता दिलेली असल्यामुळे त्यांची पुढील पिढी आधीपेक्षा प्रगत असते, त्यामुळे माणसाच्या आयुष्याच्या तुलनेत ते अतिशय लवकर शिकत असतात. त्या नॅनोकणांच्या ढगात सामूहिकपणे मेमरी टिकवण्याची क्षमता असते, व प्रेड-प्रे प्रोग्रॅममुळे घटनाक्रमातून लवकर शिकतही असतात. आधी द्विमिती मग त्रिमिती प्रतिमा तयार करणे, सावजाला योजनाबद्ध पद्धतीने जाळ्यात अडकवणे अशा अनेक घटनाक्रमांनी या कादंबरीत लेखकाने थरार निर्माण केलेला आहे. शेवटी शेवटी जॅकची पत्नी ज्युलिआ अपघात झालेला असूनही एमआरआय स्कॅन नाकारुन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेते व तेथे येते. तोपर्यंत प्रकल्पातील काही जणांचे प्राण गेलेले असतात व जॅकच्याही जिवावर एकदा नाही तर दोनदा बेतते. अशा परिस्थितीत तेथील एक महिला कर्मचारी मे चॅंग हीच जॅकला मदत करते. जॅकचा चांगला मित्र असलेल्या रिकचे वागणे अधिकाधिक संशयास्पद झालेले असते. रिक, ज्युलिआ, विंस, बॉबी अशा चौघांसाठी झायमॉसचा हा प्रकल्प खूप महत्त्वाचा का असतो? पुढे काय होते? ज्युलिआचे अफेअर असते का? ज्युलिआ एमआरआय स्कॅन का नाकारते? सर्वात शेवटच्या जीवघेण्या घटनेतून कोण कोण वाचते? नॅनोकणांचे पुढे काय होते? शेवटपर्यंत झायमॉसची प्रयोगशाळा न सोडणार्‍या रिकची भूमिका व नॅनोकणांचे ढग या सर्वांत काय दुवा असतो? जॅक तुझे सर्वात चांगले करण्याचा मी प्रयत्न करतो आहे असे रिक त्याला सांगत असतो त्यामागचे रहस्य काय असते? या प्रश्नांची उत्तरे सर्वात शेवटीच वाचकाला मिळतात.

अशा कित्येक मेंदूला मुंग्या आणणार्‍या प्रश्नांची उकल करण्यासाठी मायकल क्रायटनची ही थरारक कादंबरी "प्रे-सावज" वाचलीच पाहिजे.
सर्वात शेवटी पण तेवढेच महत्त्वाचे - मराठी साहित्यात विदेशी कादंबरीचा अनुवाद तितक्याच ताकदीने आणणे हे एक आव्हानच असते आणि ते प्रमोद जोगळेकरांनी अतिशय समर्थपणे पेलल्याचे या कादंबरीच्या वाचनात पदोपदी जाणवते. प्रमोद जोगळेकरांचे कौतुक फक्त त्यासाठीच नाही तर कादंबरीच्या शेवटी त्यांनी मूळ लेखकाने दिलेल्या संदर्भांची यादी व कादंबरीतील तंत्रज्ञान सहज लक्षात यावे यासाठी सोप्या भाषेत दिलेल्या २८ टिपांच्या परिशिष्टासाठीदेखील केले पाहिजे.

कादंबरीच्या शेवटी हे नॅनो तंत्रज्ञान योग्य प्रकारे हाताळले नाही तर त्यातून केवढा मोठा विनाशकारी आणि भयानक प्रसंग उद्भवेल अशा पद्धतीचा संदेश लेखकाने त्याच्या इतर कादंबर्‍यांप्रमाणे दिलाच आहे. हा संदेश आपल्याला अंतर्मुख नक्कीच करतो. वैज्ञानिक पार्श्वभूमीवरच्या कादंबर्‍या आवडणार्‍या वाचकांसाठी मायकल क्रायटनची "प्रे - सावज" ही एक मेजवानी आहे असे म्हणेन.

धन्यवाद,

- सागर

Thursday, July 12, 2012

"गाथा सप्तशति" - स.आ.जोगळेकर

आजच एक महत्त्वाची माहिती मिळाली ती ही की कित्येक दशके दुर्मिळ असलेले अतिशय महत्त्वाचे असे एक पुस्तक जून मधे प्रकाशित झाले आहे.
"गाथा सप्तशति" - स.आ.जोगळेकर
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
किंमत : १,०००/- रुपये
सवलत मूल्य : ७५०/- रुपये. (फार तर ८००/-)

स.आ. जोगळेकर हे नाव आजच्या पिढीला कदाचित माहिती नसेल पण खंद्या वाचकांना त्यातही इतिहासात गोडी असणार्‍यांना मात्र स.आ.जोगळेकरांची किर्ती नक्कीच माहिती असेल.

स.आ. जोगळेकरांची ५०० पानांची प्रदीर्घ आणि अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना गाथा सप्तशति या ग्रंथाला लाभलेली आहे. 'गाथा सप्तशति' काय आहे? तर वाचकांचा दुर्गा सप्तशती आणि या ग्रंथात घोळ होण्याचा संभव आहे म्हणून हा खुलासा.

इसवी सनाच्या पहिल्या शतकात "हाल सातवाहन" याने तत्कालीन सर्व उत्तम कथांचे संकलन करुन "गाथा सप्तशति" या अत्भुत ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथाचा प्रभाव म्हणा किंवा मोह म्हणा इसवीसनाच्या १२व्या शतकापर्यंत कायम होता. त्यातील सुरस कथा आजही वाचकांना मोह पाडतील.

२,००० वर्षांपूर्वीचा हा अनमोल ठेवा प्रत्येक मराठी घरा-घरात असायला हवा एवढा हा ग्रंथ बहुमोल आहे.
आपल्या सर्वांना कथासरित्सागर ऐकून माहिती असेल. महाकवि गुणाढ्याच्या बृहत्कथेचा तो अनुवाद आहे. त्याच मोलाचा हा ग्रंथ आहे. २,००० वर्षांपूर्वीचा समाज, बोली-चाली, रिती या सर्व आज समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग तर होतोच होतो. पण महाराष्ट्राची संस्कृती कशी घडत गेली याचे मूळ या ग्रंथामुळे समजून घेण्यासाठी खूप मदत होते व इतिहासाची आवड असणार्‍यांना व नसणार्‍यांनाही या 'गाथा सप्तशति' चा हा अनमोल ग्रंथ महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचे गतवैभव समजून घेण्यासाठी खूपच उपयोगी ठरेल यात शंकाच नाही. या ग्रंथाच्या वाचनाने आजच्या समाजातले आपले वागणे कसे आहे आणि २,००० वर्षांपूर्वीच्या समाजाचे कसे होते? यातील तौलनिक फरक 'गाथा सप्तशति'च्या वाचनाने जेव्हा वाचकाच्या लक्षात येते तेव्हा वाचक थक्क होतो.

अशा अनमोल ग्रंथाचे वाचकांनी स्वागत करावे आणि महाराष्ट्राची संस्कृती घडवण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या सातवाहन साम्राज्याच्या अतिशय वैभवाच्या काळात निर्मिती झालेल्या "गाथा सप्तशति" या अमूल्य ग्रंथाचे वाचकांनी स्वागत करावे ही मनापासूनची विनंती.

पुण्याच्या अक्षरधारा मधे हा ग्रंथ उपलब्ध आहे. इतर ठिकाणी प्रकाशकाचे नाव विक्रेत्याला सांगितले तरी हे पुस्तक मिळवणे सोपे पडावे.
अन्यथा पुढे प्रकाशकांचा पत्ता व संपर्क क्रमांक देत आहे. त्याची मदत व्हावी

पद्मगंधा प्रकाशन

36/11, Dhanwantari Co-op Hog. Soc.
Pandurang Colony, Erandawane, Pune-411038
Maharashtra, India.
Phone No-+91-20-25442455
Email-feedback@padmagandha.com

धन्यवाद,

- सागर

Friday, June 22, 2012

श्रद्धांजली : प्रसिद्ध लेखक भा.द.खेर यांना श्रद्धांजली

भा. द. खेर हे नाव वाचकांना अत्यंत चतुरस्त्र लेखन करणारे म्हणून परिचित आहे. मित्रांनो भा. द. खेर आज आपल्यांत नाहीत. गेल्या चार वर्षापासून ते अंथरूणाला खिळून होते. प्रकृती अस्वास्थ आणि वयोमानामुळे त्यांना द्रवरुप आहार दिला जात होता. अखेर गुरूवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.



भा. द. खेर यांची पुढील प्रमुख पुस्तके प्रसिद्ध आहेत

१. चाणक्य
२. हिरोशिमा
३. प्रबुद्ध (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर)
४. हसरे दु:ख (चार्ली चॅप्लीनचा डोळ्यांत पाणी आणणारा जीवनपट)
५. क्रांतीफुले
६. यज्ञ
७. 'दि प्रिन्सेस' या कर्नल मनोहर माळगावकर यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा मराठी अनुवाद

व इत्यादी अनेक ....

भा. द. खेर या थोर लेखकाला ही भावपूर्ण व विनम्र श्रद्धांजली

माहिती सौजन्य : ईसकाळ.कॉम

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेहता पब्लिशिंग हाऊस च्या संकेतस्थळावर भा. द. खेर यांचा जीवनपटच दिलेला आहे. तोच खाली देतो आहे

माहितीचा थेट दुवा : http://www.mehtapublishinghouse.com/AuthorDetails.aspx?AuthorCode=115

जन्म : 12 जून 1917

ठिकाण : कर्जत जि. अहमदनगर

शिक्षण : बी. ए. नंतर दोन वर्षे एल.एल.बी. चा अभ्यास

व्यवसाय : सुप्रसिद्ध कादंबरीकार, लेखक आणि पत्रकार लेखन आणि पत्रकारिता यातील कामगिरी

पत्रकारिता : दै. केसरी चे वीस वर्ष सहसंपादक, सह्याद्रीचे दहा वर्षे संपादक, समग्र टिळक 7000 पृष्ठे - संपादक, सावरकर साहित्य नवनीत चे एक संपादक या शिवाय जवळपास आठशेच्यावर पृष्ठांचे स्फुट लेखन.

लेखन : पहिले पुस्तक `नादलही' कथासंग्रह प्रकाशित - 3 सप्टेंबर 1939 आजवर जवळपास 100 लहान-मोठी पुस्तके प्रकाशित. `चरित्रात्मक कादंबरी' हा वाङमयप्रकार मराठीत प्रथम आणण्याचा मान. त्यापौकी सावरकरांच्या जीवनावरील `यज्ञ', लालबहाद्दूर शास्त्रींच्या जीवनावरील `अमृतपत्र', नेहरु कुटुंबावरील `आनंद भवन', डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील `प्रबुद्ध', चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील `हसरे दु:ख', चाफेकर बंधूंच्या जीवनावरील `क्रांतिफुले', `चाणक्य', महाभारतावरील `कल्पवृक्ष', झाशीच्या राणीच्या जीवनावरील `समर सौदामिनी', श्रीकृष्णावरील `सारथी सवा|चा', श्रीरामावरील `सेतूबंधन', स्वा. सावरकरांच्या तत्वज्ञानावरील `पूर्णाहूती', नेपोलियनच्या जीवनावरील `दिग्विजय' या कादंबर्या विशेष गाजल्या. तसेच जपानमधील अणुसंहारावरील `हिरोशिमा' ही कादंबरी गाजली. त्याचबरोबर आत्मचरित्रात्मक आठवणींची `स्मृतीयात्रा', `सूर भरला अंतरी', स्मृतीगंगा' ही पुस्तकेही गाजली. याशिवाय `दि प्रिन्सेस', `वादळ वारा', `आधांतरी' ही भाषांतरीत पुस्तकेही लोकप्रिय ठरली. पन्नास वर्षे अव्याहत लेखन. आत्तापय|त 25000 पृष्ठांच्यावर छापील पाने प्रकाशित. चरित्रात्मक कादंबरी हा प्रकार रूढ केला. तो प्रकार विशेष आवडतो.

पुरस्कार : `आनंदभवन' कादंबरीला 1974 चे सोविएत लॅण्ड नेहरूअॅवॉर्ड `हिरोशिमा'ला 1984 चे सोविएत लॅण्ड नेहरूअॅवॉर्ड `हिरोशिमा'ला 1984 चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार `हसरे दु:ख'ला 1993 चा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार

इतर मानसन्मान आणि जाहीर सत्कार : 1) स्वा. सावरकरांचे `1857 चे स्वातंत्र्यसमर' या जगद्विख्यात ग्रंथाची सहावी आवृत्ती प्रकाशित करण्याचा मान. 2) 14 जानेवारी 1947 रोजी स्वा. सावरकरांच्या `1857 चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात टिळक स्मारक मंदिरात डॉ. ना.भा. खरे यांच्या हस्ते सत्कार 3) 10 मे 1952 रोजी `अभिनव भारता'च्या सांगता समारंभाच्या वेळी क्रांतिकारक वाङ्मय लिहिल्याबद्दल स्वा. सावरकरांच्या हस्ते सत्कार. 4) 1976 मध्ये सात खंडातील सात हजार पृष्ठांचे समग्र टिळक वाङ्मयाचे संपादन केल्याबद्दल दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्याहस्ते टिळक स्मारक मंदिरामध्ये सत्कार. 5) 14 जानेवारी 1981 रोजी `केसरी' या दीड हजार पृष्ठांच्या ग्रंथाचे संपादन केल्याबद्दल दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या हस्ते टिळक स्मारक विद्यापिठात दुसर्यांदा सत्कार. 6) 1967 मध्ये `दि प्रिन्सेस' या कर्नल मनोहर माळगावकर यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीच्या भाषांतराच्या प्रकाशन समारंभात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात सत्कार. 7) 6 आॅगस्ट 1984 रोजी `हिरोशिमा' या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्यावेळी टिळक स्मारक मंदिरात स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार. 1993 मध्ये आद्य श्री शंकराचार्य पीठातर्फे प्रमुख साहित्यिक या नात्याने पुण्याच्या श्री. शंकराचार्य मंदिरात सत्कार आणि मानचिन्ह. 9) 1994 मध्ये `क्रांतिफुले' या क्रांतिवीर चाफेकर बंधूंवरील कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी माननीय श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते सत्कार. 10) 1991 मध्ये अमृतमहोत्सवानिमित्त `रामायण' कर्ते श्री. रामानंद सागर यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात जाहीर सत्कार. 11) 1995 मध्ये मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शंभरावे पुस्तक `पुर्णाहुती' प्रकाशित.

लेखनानिमित्त परदेशप्रवास 1) भारत सरकारतर्फे 1969 मध्ये `अमृतपुत्र' ही शास्त्रीजींच्या जीवनावर कादंबरी लिहिण्यासाठी स्टेट गेस्ट म्हणून रशिया दौरा. 2) जर्मन सरकारच्या निमंत्रणावरुन सुभाषबाबूंच्या जीवनावर कादंबरी लिहिण्यासाठी पूर्व आणि पश्चिम जर्मनीचा प्रवास. 3) चर्चिल, चार्ली चॅप्लिन, सावरकर यांची माहिती घेण्यासाठी 1969 मध्ये लंडनभेट. 4) स्टेट गेस्ट म्हणून 1976 मध्ये जपान सरकारच्या निमंत्रणावरुन हिरोशिमावर लिहिण्यासाठी जपान दौरा.

परदेशी प्रसारमाध्यमावरुन भाषण-मुलाखत 1) मॉस्को रेडिओ वरुन भाषण 2) एन.एच.के. जपानवरुन मुलाखत प्रसारित 3) हिरोशिमावर लिहिण्यासाठी भारतीय लेखकाचे जपानमध्ये आगमन, अशा आशयाची बातमी फोटोसह जपानी वृत्तपत्रांतून प्रकाशित.

भा. द. खेर या थोर लेखकाला ही भावपूर्ण व विनम्र श्रद्धांजली

Monday, June 18, 2012

पुण्याच्या "अक्षरधारा"त मान्सून सेलची बरसात

पुण्याच्या धावत्या भेटीत मित्रांबरोबर 'अक्षरधारा' ला भेट द्यायला गेलो. तर चक्क लॉटरीच लागली अशी परिस्थिती झाली त्या दिवशी.

"अक्षरधारा" नित्यनव्याने चांगल्या चांगल्या योजना ग्राहकांना देत असते. ती चांगली योजना योगायोगाने त्या दिवशी आमच्यासारख्या पुस्तकवेड्यांच्या झोळीत पडली म्हणजे लॉटरीच लागल्यासारखे झाले होते.
अक्षरधाराचा सध्या मान्सून सेल चालू आहे. ५५%, ३०% व २०% अशा सवलतीने खूप चांगली चांगली व नवीन पुस्तके मिळत आहेत. "अक्षरधारा"ची ही योजना पुढील दोन ते अडीच महिने सुरु राहणार आहे. तेव्हा रसिक वाचकांनी या भरघोस सवलतीचा लाभ जरुर घ्यावा.
अक्षरधाराचा पत्ता : बाजीराव रस्ता, आचार्य अत्रे सभागृहासमोर, पुणे
संपर्क ०२०-२४४४१००१ / ९८२२४७१००१
ई-मेलः info@akshardhara.com
संकेतस्थळ : www.akshardhara.com

३-४ दिवसांपूर्वीच मी एका नामवंत दुकानामध्ये गेलो होतो, त्यावेळी (मी बंगलोरवरुन नेहमी पुस्तके घेतो हे सांगूनही) १०% च्या वर सवलत देणार नाही (मेहता प्रकाशनाची पुस्तके असूनही) असे स्पष्ट सांगण्यात आले. या अनुभवाने हादरुन मी ती पुस्तके तशीच ठेवून निघून आलो होतो. तीच पुस्तके अक्षरधारात मला ५५% सवलतीने मिळाली Smile

ही मी अक्षरधारात घेतलेली पुस्तके:

१. प्रे - मूळ लेखक - मायकल क्रायटन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर - (५५% सवलत)
२. लूपहोल - सुहास शिरवळकर (५५% सवलत)
३. आवारा - सुहास शिरवळकर (५५% सवलत)
४. अंमल - सुहास शिरवळकर (५५% सवलत)
५. स्पेलबाऊंड - सुहास शिरवळकर (५५% सवलत)
६. कथा साहसवीरांच्या - विजय देवधर ( ३०% सवलत)
७. शिवरात्र - नरहर कुरुंदकर (५% सवलत) -
८. जागर - नरहर कुरुंदकर (५% सवलत)
९. सूर्य - श्री. दा. पानवलकर (५% सवलत) (हिंदीतील गाजलेला
"अर्धसत्य" चित्रपट या कादंबरीवर आधारित होता)

Saturday, June 2, 2012

"नर्मदेऽऽ हर हर"
लेखकः जगन्नाथ कुंटे
प्रकाशकः प्राजक्त प्रकाशन
किंमत : रुपये २२०/-

अलिकडेच माझ्या एका मैत्रिणीने पुस्तकविश्व.कॉम या संकेतस्थळावर "नर्मदेऽऽ हर हर" या पुस्तकावर हा पुस्तक परिचय लिहिला होता. त्या अनुषंगाने मला या पुस्तकावर काही लिहावेसे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.

या पुस्तकातून नेमके घ्यायचे काय? हा एक खूप मोठा प्रश्न दोन्ही प्रकारच्या (आस्तिक आणि नास्तिक) वाचकांपुढे असतो. एकूणच या पुस्तकातून सर्व प्रकारच्या वाचकाला जे हवे ते मिळेल. कोणाला टीका करण्याची सामग्री दिसू शकेन तर कोणाला जीवनाचे सत्य. पण टीका व्हावी कारण टीकेमुळे नेमक्या गोष्टी स्पष्ट होतात. जालावर अनेकदा मी वाचलेलेही आहे की कुंटेंनी सिगारेट ओढली, चहा पिला. यंव केलं त्यंव केलं. अशाच गोष्टी भरलेल्या आहेत. अशा टीकाकारांबद्दल आदरही आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की कुंटेंनी जे लिहिले आहे ते स्वतः अनुभवले आहे. आपण आपल्या स्वतःच्या (विशेषतः नर्मदा परिक्रमेचा अनुभव नसताना मर्यादित) अनुभवांच्या चष्म्यातून त्यांच्या अनुभवांचं मूल्यमापन करणे कितपत योग्य आहे? त्यापेक्षा जीवनाचं सत्य त्यातून उलगडतं की नाही? त्याविषयक काही चिंतन आपल्या विचारांना मिळतं की नाही? या दिशेने "नर्मदेऽऽ हर हर" चे वाचन केले तर कदाचित काहितरी गवसू शकेल. शेवटी देव म्हणजे तरी काय? मानला तर देव नाहीतर दगड.

"शहरी सवयींना सोकावलेल्या आपल्या शरीरांना सोसणारे आहे का?" हा प्रश्न शेवटी वाचकाला नक्की अंतर्मुख करुन जाईन.

"नर्मदेऽऽ हर हर" कडे मुख्यतः वाचकांचे दुर्लक्ष होते ते मुख्यतः याच प्रमुख कारणामुळे. एकदा टीका करण्याची सामग्री दिसली की पूर्वग्रह निर्माण होतो. पूर्वग्रह निर्माण झाला आणि पुस्तकाचे वाचन झाले तरीसुद्धा आपले चाणाक्ष मन टीका करण्याची सामग्रीच त्यात शोधत असते. त्यातून काही मोती आपल्या नकळत कधीच गळून गेल्याचेही लक्षात येत नाही. सोन्याच्या खाणीत मणभर मातीचा ढीगारा उपसल्यावर सोन्याचा कण सापडतो त्याचप्रमाणे पुस्तकाच्या वाचनाचे असते. नेमके सोन्याचे कण कोणते? हे शेवटी ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. तरीपण तरल मनाने कोणत्याही पुस्तकाचे वाचन केले की हे सोन्याचे कण आपोआप आपल्या झोळीत स्वतःहून पडतात.

जगन्नाथ कुंटेंची "नर्मदेऽऽ हर हर" व्यतिरिक्त नित्य निरंजन आणि साधनामस्त ही २ पुस्तके मी स्वतः वाचली आहेत. त्यामुळे या लेखकाचे अनुभव पूर्णपणे ओघवते आहेत एवढे नक्की सांगू शकतो. किमान मला तरी कुंटेबुवांच्या या अनुभवांत लबाडीचा लवलेशही कुठे दिसला नाही. "नर्मदेऽऽ हर हर" मधील आपल्याला पटत नसलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले की आपोआप या पुस्तकातील प्रत्यक्ष अनुभवांचे सौंदर्य जाणवेल. साधनामस्त मधे साधनेच्या अनुभवांबद्दल जास्त लिहिले आहे. पण "नर्मदेऽऽ हर हर" हे मुख्य करुन प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेतील अनुभवांवर आधारित आहे. तेव्हा एका प्रवाश्याचे अनुभव म्हणून जरी याकडे पाहिले तरी ही नर्मदा परिक्रमा वाचकांना आवडेल असे मला वाटते. जिज्ञासूंनी जगन्नाथ कुंटे यांची ही नर्मदा परिक्रमेची अनुभवयात्रा अवश्य वाचावी.

Wednesday, May 16, 2012

साने गुरुजी समग्र साहित्य


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

साने गुरुजींचे साहित्य वाचले नाही असा वाचक दुर्मिळच आहे.
"श्यामची आई" ही साने गुरुजींची अजरामर कलाकृती असली तरी साने गुरुजींनी एवढे चतुरस्त्र लेखन केले आहे की त्यांचे प्रत्येक पुस्तक एक वेगळा अनुभव ठरावा.

साने गुरुजींचे समग्र साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पूजासॉफ्ट टेक्नॉलॉजीज् च्या श्री. माधव शिरवळकर यांनी केला आहे. यासाठी धारप असोशिएट्स ने आर्थिक आघाडीवर मदत करुन एक अतिशय मोलाचे कार्य केले आहे.

तर साने गुरुजींच्या समग्र साहित्याचा इंटरनेटच्या माध्यमातून आस्वाद वाचकांनी घ्यावा यासाठी या संकेतस्थळाची लिंक देत आहे : साने गुरुजी समग्र साहित्य : http://saneguruji.net/

धन्यवाद
-सागर

Tuesday, May 15, 2012

जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )

जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट ) हास्य

जुने चांदोबा वाचा जुन्या काळात रमा


नवीन चालत असलेली लिंक : https://www.chandamama.in/marathi/


जुन्या लिंक्स चालत नाहीयेत. वाचकांनी वरील लिंक वापरावी. धन्यवाद. 

http://www.chandamama.com/lang/MAR/index.htm

जुन्या चांदोबांची थेट लिंक : http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm

धूमकेतू, कांशाचा किल्ला, तीन मांत्रिक, अग्निद्विप, भल्लूक मांत्रिक, इ... सर्व कथा आणि सर्व चांदोबा जसाच्या तसा वाचा हास्य

From General

"मर्मभेद" या शशी भागवत यांच्या कादंबरी बद्दल

वीरधवल ही एकच अत्भुतरम्य कादंबरी नाथमाधवांनी लिहिलेली होती.
गो.ना.दातार यांनी इंद्रभुवनगुहा, शालिवाहन=शक, विलासमंदीर, कालिकामूर्ति, अधःपात, रहस्यभेद अशा एकापेक्षा एक सरस अत्भुतरम्य कादंबर्‍यांची (रेनॉल्ड्सच्या कादंबर्‍यांवरुन घेतल्या असल्या तरीही) निर्मिती केली होती. मला वाटते भिकाजी भिडे यांनी लिहिलेली  मायावति या नावाची कादंबरी रायडर हॅग्गार्ड याच्या "शी' या इंग्रजी कादंबरीवर बेतलेली होती.

कित्येक वर्षे अत्भुतरम्य कादंबर्‍यांचा दुष्काळ पडला होता.
मला वाटते ज्ञानदा पब्लिकेशन्स ने १९६६ का १९७६ साली (नक्की आठवत नाही) शशी भागवत यांची "मर्मभेद" प्रकाशित केली आणि अत्भुतरम्य कादंबर्‍या आवडणार्‍या वाचकवर्गात एकच गदारोळ उडाला. आपल्या ऐयारी विद्येने आणि अत्भुत पराक्रमाने ऐयारशिरोमणी वीरभद्र या पात्राने अत्भुतरम्य कादंबर्‍या आवडणार्‍या वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता या कादंबरीतही ऐय्यार विद्येचे चमत्कार आले होते. मर्मभेदातील काही पात्रे आपण पाहूयात ज्यांच्यामुळे मर्मभेद हे देवकीनंदन खत्री यांच्या कादंबरीचे मराठीकरण वाटावे इतपत साम्य असलेल्या व्यक्तीरेखा "मर्मभेद" मध्ये आहेत.
असे असो वा नसो, पण "मर्मभेद" अतिशय अत्भुतरम्य कादंबरी आहे यात शंकाच नाही.

मर्मभेदातली पात्रे :
कृष्णांत : हा या कादंबरीतील खलनायक ( चंद्रकांता मधील क्रूरसिंग?)
शार्दूलसिंह
तेजस्विनी (ही की प्रलयिनी? चंद्रकांतातील चंद्रकांता?)
प्रलयिनी
सरदार रुंडकेतू
सुलसादेवी
ऐयारशिरोमणी वीरभद्र (चंद्रकांतातील तेजसिंह?)
रमलशास्त्री विश्वंभर (चंद्रकांतातील पंडित जगन्नाथ?)
युवराज कुणाल (चंद्रकांतातील विरेन्द्रसिंह )
ऐयार कंदुक आणि मंडूक (चंद्रकांतातील क्रूरसिंगचे २ ऐय्यार सेवक आफतखां व जालिमखां)
शार्दूलसिंहाची पत्नी गजगौरी
तिचे मामा सरदार सत्यपालसिंह
ऐयार भेदक (चंद्रकांतातील बद्रीनाथ)
कालिका / कलंकी
मायावती
कापालिक कंकाल
सम्राट

प्रथमावृत्तीनंतर १९७९, १९९२, १९९९? / २००४? अशा मर्मभेदच्या आवृत्त्या निघाल्या. हे पुस्तक शोधून शोधून मी आणि माझ्यासारखे कित्येक मर्मभेदप्रेमी दमलो, पण "मर्मभेद" पुन्हा छापायचे प्रकाशक काही मनावर घेत नाहियेत, तेव्हा म्हटले या धाग्याच्या निमित्ताने जाणकार लोकांकडून मर्मभेदचे कथानक माहिती करुन घ्यावे व पुन्हा एकदा मर्मभेदामधील अत्भुतरम्यतेचा अनुभव आपणही घ्यावा व सर्वांनाही द्यावा. हास्य

तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मर्मभेदबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे त्याअनुषंगाने चर्चा करा व मर्मभेद या अत्भुतरम्य कादंबरीतील थरार पुन्हा एकदा सर्वांनी अनुभवा ही विनंती




(चित्र जालावरुन घेतले आहे. त्याचे अधिकार संबंधित व्यक्ती वा संस्थांकडे सुरक्षित आहेत)

अद्भुतरम्य कादंबऱ्यांचा मोठा दुष्काळ शशी भागवत यांच्या ३ कादंबर्यांनंतर होता.
पण अलीकडेच २ अद्भुतरम्य कादंबऱ्या मी  पाहिल्या आहेत आणि त्यातली १ वाचली पण आहे. एकूणच हा साहित्य प्रकार पुन्हा मराठी साहित्यात लवकरच पुन्हा एकदा बाळसे धरेल असे दिसते आहे.
१. हिरण्यदुर्ग - सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिलेली ही अद्भुतरम्य कादंबरी मी वाचली आहे. अतिशय सुंदर आणि पूर्णपणे स्वतंत्र अशी ही कादंबरी आहे. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या सातवाहन राजांच्या पार्श्वभूमीवरची ही सुंदर कादंबरी आहे. एक अतिशय थरार वाचकांना ही कादंबरी वाचताना अनुभवायला मिळेल हे खात्रीने सांगू शकतो.  

महाराष्ट्र टाइम्स मध्ये या कादंबरीचा परिचय वाचता येईल : https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/book-review/articleshow/46157310.cms 

अद्भुतरम्य कादंबरी साहित्यप्रकार आवडणार्या वाचकांना या कादंबर्या ऑनलाईन ऑर्डर करता येतील. पुढे लिंक्स दिल्या आहेत.

ऍमेझॉन : https://www.amazon.in/Hiranyadurg-Marathi-Sanjay-Sonavani/dp/B07Z2R98LB/ किंवा https://www.amazon.in/Hiranyadurg-Sanjay-Sonwani/dp/B016YEZMCQ/
बुकगंगा : https://www.bookganga.com/R/3CZKG
 
२. शौर्यशृंग - अभिषेक साळुंखे (याचे वाचन अजून मी केले नाहीये. )
ऍमेझॉन : https://www.amazon.in/Shouryshrung-Abhishek-salunkhe/dp/9357376135
बुकगंगा : https://www.bookganga.com/R/8O1YO
 

"दलित कुसुम"


मित्रांनो,

कालच मी इंटरनेटवर अवघ्या ११० पानांची "दलित कुसुम" ही कादंबरी एका दमात वाचून संपवली

त्याकाळी अवघी १२ आणे किंमत असलेली 'दलित कुसुम' ही कादंबरी मूळ बंगालीत "श्री. बाबू नारायण दास मौलिक" यांनी लिहिलेली होती. तिचा "श्रीकार्तिकप्रसाद" यांनी केलेला हिंदी अनुवाद वापरुन "कै. रा.रा.अनंत केशव चितळे" आणि "नारायण रामचंद्र गोखले" यांनी तिला मराठीत आणली. १९०२ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी नशिबाचे फेरे कसे फिरतात आणि मानवी इच्छा माणसाकडून काय काय करवून घेतात हे अतिशय प्रभावीपणे दाखवते. मुळात ही कादंबरी लिहिली गेली त्याकाळची मराठी मला खूप आवडते म्हणूनही असेल, पण मला ही छोटीशी कादंबरी आवडली. तुम्हाला वाचायची असेल तर पुढे दुवा दिलाच आहे

दलित कुसुम ही कादंबरी ऑनलाईन इथे क्लिक करुन वाचता येईल

फक्त हीच कादंबरी नव्हे तर प्रताधिकारमुक्त कित्येक जुनी मराठी पुस्तके ऑनलाईन इथे वाचता येतील.

दुवा: http://www.new.dli.ernet.in/

Tuesday, May 8, 2012

"पानिपत असे घडले..." - जाहीर प्रकाशन समारंभ १७ मे २०१२

नमस्कार वाचनप्रेमी मित्र-मैत्रिणींनो,

इतिहासाचे सत्य अवलोकन वर्तमानात स्थितप्रज्ञता देते आणि भविष्यातील अभिमानाचा पाया बळकट करते असे मला वाटते. सत्याच्या पायावर आधारित असे अभिमान राष्ट्रनिर्मितीचे बळ सर्वसामान्यांना देतात. इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळून अवघे एक शतकही पूर्ण झाले नाही तोच जगभरात भारतीयांच्या सर्व क्षेत्रातील पराक्रमाने अवघे विश्व स्तिमित झालेले आहे. तत्पूर्वी अवघा भारतवर्ष मराठ्यांच्या पराक्रमाने दबून होता. मराठ्यांचा हा अगदी अलिकडचा इतिहास पाहिला तर 'पानिपत झाले' हा वाक्प्रचार महाराष्ट्राच्या मान-सन्मानाला एका अश्वत्थाम्याच्या चिरकाल भळभळणार्‍या जखमेसारखा चिकटून बसला आहे. या 'पानिपत युद्धाचे' सत्य-असत्य मराठी म्हणून अभिमान बाळगणार्‍या सर्वांनीच माहिती करुन घेणे गरजेचे आहे. १७६१ सालच्या या महत्त्वाच्या पानिपत संग्रामावर लाखो मराठी पुस्तकांच्या गर्दीत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच संशोधनग्रंथ उपलब्ध आहेत.

या पार्श्वभूमीवर माझे एक तरुण मित्र श्री. संजय क्षीरसागर यांनी पानिपत युद्धावर उपलब्ध असलेल्या जवळपास सर्व साधनांच्या साहाय्याने मराठ्यांचे 'पानिपत का झाले याची चिकित्सा केली आहे. या विश्लेषणाचे सार म्हणजे जवळपास पावणे सहाशे पृष्ठांचा "पानिपत असे घडले..." हा विश्लेषणात्मक संशोधनग्रंथ आकारास आला. या ग्रंथामध्ये शेकडो मूळ संदर्भ जसेच्या तसे दिलेले आहेत. व त्या अनुषंगाने या तरुण लेखकाने त्याचे तटस्थ दृष्टीकोनातून विश्लेषणही केले आहे. यामुळे केवळ पानिपत युद्धावरचे सत्याच्या जवळ जाणारे विश्लेषण एवढ्यापुरताच हा ग्रंथ मर्यादित न राहता 'पानिपत युद्धाचे ' सर्वांगीण ऐतिहासिक दस्तावेजांचे संदर्भ एकत्रितरित्या तपासून पाहण्यासाठी देखील एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे. या ग्रंथाच्या शेवटी जोडलेले परिशिष्ट माहितीत मोलाची भर टाकतेच. शिवाय सर्वात शेवटी दिलेल्या नकाशांतून पानिपत युद्धाचे सत्य उलगडण्यास सोपे पडते. अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे सर्वसामान्य वाचकांपासून ते थोर विचारवंतांपर्यंत सर्व थरांतील वाचकांना हा ग्रंथ आकलनास अतिशय सोपा आहे. आणि मला वाटते हेच लेखकाचे नि:संशय यश आहे
इतिहास या विषयांत मला रस असल्यामुळे व पानिपत युद्धावरील कित्येक ऐतिहासिक साधने मी स्वतः वाचलेली आहेत, त्यामुळे लवकरच या संशोधन ग्रंथावर मी एक परिक्षण लिहीणार आहे. पण तूर्तास या पुस्तकाच्या स्वागत सोहळ्यास आपल्यासारख्या प्रत्येक वाचनप्रेमींनी सज्ज व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच.

"पानिपत असे घडले..." या ग्रंथाचा जाहीर प्रकाशन समारंभ दिनांक १७ मे २०१२, गुरुवार या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता 'दैनिक नवशक्ती'चे संपादक श्री.सचिन परब यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धी हॉल, ठाणे येथे होणार आहे. तरी 'पानिपत युद्धाच्या अनुषंगाने ऐतिहासिक संशोधनग्रंथांत महत्त्वाचे स्थान प्राप्त करु शकणार्‍या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास आपण आपली हजेरी लावावी ही आग्रहाची विनंती. सोबत या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका जोडलेली आहे.

धन्यवाद,
सागर भंडारे
























पुस्तकाचे नावः "पानिपत असे घडले..."
लेखक : संजय क्षीरसागर
प्रकाशन : पुष्प प्रकाशन
किंमत : ५०० रुपये.
प्रकाशन सवलत मूल्य : ३५० रुपये

Friday, April 27, 2012

'मायहँगआऊटस्टोअर' येथे पुस्तकांच्या खरेदीवर २५ ते ३०% सवलत

मायहँगआऊटस्टोअर ने ई-मेलद्वारे फ्लॅट २५% डिस्काऊंटच्या घोषणेची माहिती कळवली
म्हणून साईटवर शोध घेतला तर बरीच हवी असणारी पुस्तके दिसली.

खालील पुस्तके खूप चांगल्या सवलतीत मिळाली.

१. एका कोळीयाने - अर्न्स्ट हेमिंग्वे - अनु: पु.ल.देशपांडे - २५% सवलत


























२. नो कम बॅक्स - फ्रेडरिक फोरसिथ - अनु: विजय देवधर - ३०% सवलत



























. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी : संहिता आणि समीक्षा - शंकर सारडा - २५% सवलत















. एव्हरेस्टच्या कुशीत मी - शेर्पा तेनसिंग अनु: श्रीपाद केळकर - ४% सवलत (रु. ४८/-)































. जगप्रसिध्द विज्ञानकथा - निरंजन घाटे - ३०% सवलत