Wednesday, May 16, 2012

साने गुरुजी समग्र साहित्य


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

साने गुरुजींचे साहित्य वाचले नाही असा वाचक दुर्मिळच आहे.
"श्यामची आई" ही साने गुरुजींची अजरामर कलाकृती असली तरी साने गुरुजींनी एवढे चतुरस्त्र लेखन केले आहे की त्यांचे प्रत्येक पुस्तक एक वेगळा अनुभव ठरावा.

साने गुरुजींचे समग्र साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पूजासॉफ्ट टेक्नॉलॉजीज् च्या श्री. माधव शिरवळकर यांनी केला आहे. यासाठी धारप असोशिएट्स ने आर्थिक आघाडीवर मदत करुन एक अतिशय मोलाचे कार्य केले आहे.

तर साने गुरुजींच्या समग्र साहित्याचा इंटरनेटच्या माध्यमातून आस्वाद वाचकांनी घ्यावा यासाठी या संकेतस्थळाची लिंक देत आहे : साने गुरुजी समग्र साहित्य : http://saneguruji.net/

धन्यवाद
-सागर

Tuesday, May 15, 2012

जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )

जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट ) हास्य

जुने चांदोबा वाचा जुन्या काळात रमा


नवीन चालत असलेली लिंक : https://www.chandamama.in/marathi/


जुन्या लिंक्स चालत नाहीयेत. वाचकांनी वरील लिंक वापरावी. धन्यवाद. 

http://www.chandamama.com/lang/MAR/index.htm

जुन्या चांदोबांची थेट लिंक : http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm

धूमकेतू, कांशाचा किल्ला, तीन मांत्रिक, अग्निद्विप, भल्लूक मांत्रिक, इ... सर्व कथा आणि सर्व चांदोबा जसाच्या तसा वाचा हास्य

From General

"मर्मभेद" या शशी भागवत यांच्या कादंबरी बद्दल

वीरधवल ही एकच अत्भुतरम्य कादंबरी नाथमाधवांनी लिहिलेली होती.
गो.ना.दातार यांनी इंद्रभुवनगुहा, शालिवाहन=शक, विलासमंदीर, कालिकामूर्ति, अधःपात, रहस्यभेद अशा एकापेक्षा एक सरस अत्भुतरम्य कादंबर्‍यांची (रेनॉल्ड्सच्या कादंबर्‍यांवरुन घेतल्या असल्या तरीही) निर्मिती केली होती. मला वाटते भिकाजी भिडे यांनी लिहिलेली  मायावति या नावाची कादंबरी रायडर हॅग्गार्ड याच्या "शी' या इंग्रजी कादंबरीवर बेतलेली होती.

कित्येक वर्षे अत्भुतरम्य कादंबर्‍यांचा दुष्काळ पडला होता.
मला वाटते ज्ञानदा पब्लिकेशन्स ने १९६६ का १९७६ साली (नक्की आठवत नाही) शशी भागवत यांची "मर्मभेद" प्रकाशित केली आणि अत्भुतरम्य कादंबर्‍या आवडणार्‍या वाचकवर्गात एकच गदारोळ उडाला. आपल्या ऐयारी विद्येने आणि अत्भुत पराक्रमाने ऐयारशिरोमणी वीरभद्र या पात्राने अत्भुतरम्य कादंबर्‍या आवडणार्‍या वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता या कादंबरीतही ऐय्यार विद्येचे चमत्कार आले होते. मर्मभेदातील काही पात्रे आपण पाहूयात ज्यांच्यामुळे मर्मभेद हे देवकीनंदन खत्री यांच्या कादंबरीचे मराठीकरण वाटावे इतपत साम्य असलेल्या व्यक्तीरेखा "मर्मभेद" मध्ये आहेत.
असे असो वा नसो, पण "मर्मभेद" अतिशय अत्भुतरम्य कादंबरी आहे यात शंकाच नाही.

मर्मभेदातली पात्रे :
कृष्णांत : हा या कादंबरीतील खलनायक ( चंद्रकांता मधील क्रूरसिंग?)
शार्दूलसिंह
तेजस्विनी (ही की प्रलयिनी? चंद्रकांतातील चंद्रकांता?)
प्रलयिनी
सरदार रुंडकेतू
सुलसादेवी
ऐयारशिरोमणी वीरभद्र (चंद्रकांतातील तेजसिंह?)
रमलशास्त्री विश्वंभर (चंद्रकांतातील पंडित जगन्नाथ?)
युवराज कुणाल (चंद्रकांतातील विरेन्द्रसिंह )
ऐयार कंदुक आणि मंडूक (चंद्रकांतातील क्रूरसिंगचे २ ऐय्यार सेवक आफतखां व जालिमखां)
शार्दूलसिंहाची पत्नी गजगौरी
तिचे मामा सरदार सत्यपालसिंह
ऐयार भेदक (चंद्रकांतातील बद्रीनाथ)
कालिका / कलंकी
मायावती
कापालिक कंकाल
सम्राट

प्रथमावृत्तीनंतर १९७९, १९९२, १९९९? / २००४? अशा मर्मभेदच्या आवृत्त्या निघाल्या. हे पुस्तक शोधून शोधून मी आणि माझ्यासारखे कित्येक मर्मभेदप्रेमी दमलो, पण "मर्मभेद" पुन्हा छापायचे प्रकाशक काही मनावर घेत नाहियेत, तेव्हा म्हटले या धाग्याच्या निमित्ताने जाणकार लोकांकडून मर्मभेदचे कथानक माहिती करुन घ्यावे व पुन्हा एकदा मर्मभेदामधील अत्भुतरम्यतेचा अनुभव आपणही घ्यावा व सर्वांनाही द्यावा. हास्य

तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मर्मभेदबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे त्याअनुषंगाने चर्चा करा व मर्मभेद या अत्भुतरम्य कादंबरीतील थरार पुन्हा एकदा सर्वांनी अनुभवा ही विनंती




(चित्र जालावरुन घेतले आहे. त्याचे अधिकार संबंधित व्यक्ती वा संस्थांकडे सुरक्षित आहेत)

अद्भुतरम्य कादंबऱ्यांचा मोठा दुष्काळ शशी भागवत यांच्या ३ कादंबर्यांनंतर होता.
पण अलीकडेच २ अद्भुतरम्य कादंबऱ्या मी  पाहिल्या आहेत आणि त्यातली १ वाचली पण आहे. एकूणच हा साहित्य प्रकार पुन्हा मराठी साहित्यात लवकरच पुन्हा एकदा बाळसे धरेल असे दिसते आहे.
१. हिरण्यदुर्ग - सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिलेली ही अद्भुतरम्य कादंबरी मी वाचली आहे. अतिशय सुंदर आणि पूर्णपणे स्वतंत्र अशी ही कादंबरी आहे. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या सातवाहन राजांच्या पार्श्वभूमीवरची ही सुंदर कादंबरी आहे. एक अतिशय थरार वाचकांना ही कादंबरी वाचताना अनुभवायला मिळेल हे खात्रीने सांगू शकतो.  

महाराष्ट्र टाइम्स मध्ये या कादंबरीचा परिचय वाचता येईल : https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/book-review/articleshow/46157310.cms 

अद्भुतरम्य कादंबरी साहित्यप्रकार आवडणार्या वाचकांना या कादंबर्या ऑनलाईन ऑर्डर करता येतील. पुढे लिंक्स दिल्या आहेत.

ऍमेझॉन : https://www.amazon.in/Hiranyadurg-Marathi-Sanjay-Sonavani/dp/B07Z2R98LB/ किंवा https://www.amazon.in/Hiranyadurg-Sanjay-Sonwani/dp/B016YEZMCQ/
बुकगंगा : https://www.bookganga.com/R/3CZKG
 
२. शौर्यशृंग - अभिषेक साळुंखे (याचे वाचन अजून मी केले नाहीये. )
ऍमेझॉन : https://www.amazon.in/Shouryshrung-Abhishek-salunkhe/dp/9357376135
बुकगंगा : https://www.bookganga.com/R/8O1YO
 

"दलित कुसुम"


मित्रांनो,

कालच मी इंटरनेटवर अवघ्या ११० पानांची "दलित कुसुम" ही कादंबरी एका दमात वाचून संपवली

त्याकाळी अवघी १२ आणे किंमत असलेली 'दलित कुसुम' ही कादंबरी मूळ बंगालीत "श्री. बाबू नारायण दास मौलिक" यांनी लिहिलेली होती. तिचा "श्रीकार्तिकप्रसाद" यांनी केलेला हिंदी अनुवाद वापरुन "कै. रा.रा.अनंत केशव चितळे" आणि "नारायण रामचंद्र गोखले" यांनी तिला मराठीत आणली. १९०२ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी नशिबाचे फेरे कसे फिरतात आणि मानवी इच्छा माणसाकडून काय काय करवून घेतात हे अतिशय प्रभावीपणे दाखवते. मुळात ही कादंबरी लिहिली गेली त्याकाळची मराठी मला खूप आवडते म्हणूनही असेल, पण मला ही छोटीशी कादंबरी आवडली. तुम्हाला वाचायची असेल तर पुढे दुवा दिलाच आहे

दलित कुसुम ही कादंबरी ऑनलाईन इथे क्लिक करुन वाचता येईल

फक्त हीच कादंबरी नव्हे तर प्रताधिकारमुक्त कित्येक जुनी मराठी पुस्तके ऑनलाईन इथे वाचता येतील.

दुवा: http://www.new.dli.ernet.in/

Tuesday, May 8, 2012

"पानिपत असे घडले..." - जाहीर प्रकाशन समारंभ १७ मे २०१२

नमस्कार वाचनप्रेमी मित्र-मैत्रिणींनो,

इतिहासाचे सत्य अवलोकन वर्तमानात स्थितप्रज्ञता देते आणि भविष्यातील अभिमानाचा पाया बळकट करते असे मला वाटते. सत्याच्या पायावर आधारित असे अभिमान राष्ट्रनिर्मितीचे बळ सर्वसामान्यांना देतात. इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळून अवघे एक शतकही पूर्ण झाले नाही तोच जगभरात भारतीयांच्या सर्व क्षेत्रातील पराक्रमाने अवघे विश्व स्तिमित झालेले आहे. तत्पूर्वी अवघा भारतवर्ष मराठ्यांच्या पराक्रमाने दबून होता. मराठ्यांचा हा अगदी अलिकडचा इतिहास पाहिला तर 'पानिपत झाले' हा वाक्प्रचार महाराष्ट्राच्या मान-सन्मानाला एका अश्वत्थाम्याच्या चिरकाल भळभळणार्‍या जखमेसारखा चिकटून बसला आहे. या 'पानिपत युद्धाचे' सत्य-असत्य मराठी म्हणून अभिमान बाळगणार्‍या सर्वांनीच माहिती करुन घेणे गरजेचे आहे. १७६१ सालच्या या महत्त्वाच्या पानिपत संग्रामावर लाखो मराठी पुस्तकांच्या गर्दीत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच संशोधनग्रंथ उपलब्ध आहेत.

या पार्श्वभूमीवर माझे एक तरुण मित्र श्री. संजय क्षीरसागर यांनी पानिपत युद्धावर उपलब्ध असलेल्या जवळपास सर्व साधनांच्या साहाय्याने मराठ्यांचे 'पानिपत का झाले याची चिकित्सा केली आहे. या विश्लेषणाचे सार म्हणजे जवळपास पावणे सहाशे पृष्ठांचा "पानिपत असे घडले..." हा विश्लेषणात्मक संशोधनग्रंथ आकारास आला. या ग्रंथामध्ये शेकडो मूळ संदर्भ जसेच्या तसे दिलेले आहेत. व त्या अनुषंगाने या तरुण लेखकाने त्याचे तटस्थ दृष्टीकोनातून विश्लेषणही केले आहे. यामुळे केवळ पानिपत युद्धावरचे सत्याच्या जवळ जाणारे विश्लेषण एवढ्यापुरताच हा ग्रंथ मर्यादित न राहता 'पानिपत युद्धाचे ' सर्वांगीण ऐतिहासिक दस्तावेजांचे संदर्भ एकत्रितरित्या तपासून पाहण्यासाठी देखील एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे. या ग्रंथाच्या शेवटी जोडलेले परिशिष्ट माहितीत मोलाची भर टाकतेच. शिवाय सर्वात शेवटी दिलेल्या नकाशांतून पानिपत युद्धाचे सत्य उलगडण्यास सोपे पडते. अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे सर्वसामान्य वाचकांपासून ते थोर विचारवंतांपर्यंत सर्व थरांतील वाचकांना हा ग्रंथ आकलनास अतिशय सोपा आहे. आणि मला वाटते हेच लेखकाचे नि:संशय यश आहे
इतिहास या विषयांत मला रस असल्यामुळे व पानिपत युद्धावरील कित्येक ऐतिहासिक साधने मी स्वतः वाचलेली आहेत, त्यामुळे लवकरच या संशोधन ग्रंथावर मी एक परिक्षण लिहीणार आहे. पण तूर्तास या पुस्तकाच्या स्वागत सोहळ्यास आपल्यासारख्या प्रत्येक वाचनप्रेमींनी सज्ज व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच.

"पानिपत असे घडले..." या ग्रंथाचा जाहीर प्रकाशन समारंभ दिनांक १७ मे २०१२, गुरुवार या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता 'दैनिक नवशक्ती'चे संपादक श्री.सचिन परब यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धी हॉल, ठाणे येथे होणार आहे. तरी 'पानिपत युद्धाच्या अनुषंगाने ऐतिहासिक संशोधनग्रंथांत महत्त्वाचे स्थान प्राप्त करु शकणार्‍या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास आपण आपली हजेरी लावावी ही आग्रहाची विनंती. सोबत या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका जोडलेली आहे.

धन्यवाद,
सागर भंडारे
























पुस्तकाचे नावः "पानिपत असे घडले..."
लेखक : संजय क्षीरसागर
प्रकाशन : पुष्प प्रकाशन
किंमत : ५०० रुपये.
प्रकाशन सवलत मूल्य : ३५० रुपये